नागपूर - गेल्या चार दिवसांपासून नागपूर शहरात आणि जिल्ह्यातील सर्वदूर पावसाची संततधार कायम आहे. पावसामुळे जिल्ह्यातील नवेगाव खैरी, नांद, वेना या धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे पारशिवनी सावनेर, रामटेक, उमरेड आणि भिवापूर या तालुक्यातील अनेक गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर नागपूरच्या जिल्हाधिकारी आर. विमला यांनी एक ऑडिओ क्लिप जारी करून नागरिकांना काही सूचना करुन सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
गोसेखुर्द प्रकल्पातील बॅकवॉटरमुळे धोका - गोसेखुर्द प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाण्याचा ओढा येत आहे. त्यामुळे प्रकल्पातील बॅकवॉटरमुळेही काही ठिकाणी पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे. पाणी पातळी वाढल्याने या परिसरातील नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या परिसरातील गावकऱ्यांनी सतर्क रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आर. विमला यांनी केले आहे.
![Nagpur Rain Update](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-ngp-03-nagpur-district-many-taluka-risk-flood-7204462_13072022112053_1307f_1657691453_953.jpg)