मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मेट्रो कारशेडसारख्या प्रकल्पांना स्थगिती देण्याचे आदेश देऊन राज्याची 'इनव्हेस्ट्मेंट अनफ्रेंडली' प्रतिमा निर्माण केल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. झाडे तोडल्याशिवाय एकही पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण होऊ शकत नाही, असे एका मराठी दैनिकाशी बोलताना फडणवीस म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले, आरेमध्ये आम्ही सुमारे २ हजार झाडे तोडली खरी, पण त्यापूर्वी चार वर्षांपूर्वी आम्ही जवळजवळ २३ हजार रोपे लावली असून ती जिवंत आहेत. त्यानंतरही आणखीन २५ हजार रोपे लावली जात आहेत. उद्योगक्षेत्रातील लोक आता विचार करीत आहेत की, महाराष्ट्र अजूनही गुंतवणुकीसाठी अनुकूल आहे की नाही. त्यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र सरकारने गुंतवणुकीसाठी राज्याची अनुकूलता नसल्याचा संदेश देऊ नये.
काही महिन्यांपूर्वी मुंबई महापालिकेच्या बैठकीत ग्रीन बेल्ट या आरे कॉलनीतील मेट्रो कारशेडसाठी मार्ग काढण्याकरीता भाजपने २० हजाराहून अधिक झाडे तोडण्याच्या समर्थनार्थ मतदान केले. या निर्णयाला शिवसेना आणि इतर काही पक्षांनी तीव्र विरोध दर्शविला होता.
फडणवीस म्हणाले, जर दीर्घकाळापर्यंत मेट्रो बर्याच कार्बन उत्सर्जनाची बचत करणार असेल तर काही झाडे तोडणे हे इतके मोठे प्रकरण बनवू नये. काही लोक बुलेट ट्रेनवरदेखील आक्षेप घेत आहेत. त्यांनी प्रथम जपान आणि चीनला विचारले पाहिजे की अशा वेगवान गाड्यांचा त्यांना फायदा झाला आहे की नाही. या देशांना अशा प्रकारच्या प्रकल्पांनी त्यांच्या राष्ट्रीय वाढीस हातभार लावल्याचे उघडपणे सांगितले आहे. अशा प्रकल्पांचा फायदा आपल्यालाही घेता येऊ शकेल.