मुंबई - विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचाचा दुसरा दिवस गाजला तो विरोधकांच्या गोंधळामुळे. सभागृहाचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर नियम 57 अन्वये चर्चेची मागणी केली.
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची मागणी
ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकारने परिपूर्ण डेटा तयार केला नाही योग्य कालावधीत डेटा तयार करणे शक्य असतानाही राज्य सरकारने डेटा तयार केला नाही असा आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी करत सभागृहात या विषयावर सर्व कामकाज बाजूला ठेवून नियम 57 अन्वये चर्चा करा अशी मागणी केली. सरकारने नेमलेल्या राज्य मागास वर्ग आयोगाने आपले काम चोख केले पाहिजे मात्र तसे होत नाही. कुणाची राजकीय सोय लावण्यासाठी मागास वर्गातील पदे भरू नका असा टोलाही फडणवीस यांनी यावेळी लगावला.
ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नाहीत- छगन भुजबळ
दरम्यान याबाबत अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तसेच ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी आपले मत मांडताना एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा चिखलफेक करण्यापेक्षा सर्वांनी एकत्र बसून या विषयावर तोडगा काढायला पाहिजे अशी विनंती फडणवीस यांना केली. तसेच जोपर्यंत ओबीसी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणुका न घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असल्याची माहितीही त्यांनी सभागृहात दिली.
विरोधकांची घोषणाबाजी सुरूच
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी फडणवीस यांची मागणी फेटाळून लावली त्यामुळे विरोधकांनी सभागृहात गदारोळ सुरू केला. वेल मध्ये विरोधकांनी गदारोळ केल्याने प्रश्नोत्तरांची कामकाज होऊ शकले नाही. त्यानंतर दोन वेळा 20 मिनिटांसाठी सभागृह तहकूब करावे लागले. तरीही विरोधकांचा गोंधळ सुरूच असल्याने राज्यपालांच्या अभिभाषणावर केवळ रवींद्र वायकर यांनी आपले भाषण कसे तरी आठवण आटोपते घेतले तरीही विरोधकांचा गदारोळ सुरूच असल्याने शासकीय ठराव आणि विधेयके याच गदारोळात संमत करण्यात आली. अखेरीस दिवसभराचे कामकाज विरोधकांच्या गदारोळामुळे गुंडाळण्यात आले.
हेही वाचा - Bail to Rane : दिशा सालियन प्रकरण! राणे पिता-पुत्रांना सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर