मुंबई - आझाद मैदानात आज मराठा क्रांती मोर्चाची सभा पार पडली. त्यानंतर पत्रकार परिषद झाली. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विरेंद्र पवार यांनी आपल्या मागण्याबाबत सांगितले. यावेळी जर आमची फसगत झाली, तर सध्या अस्तित्वात असलेल्या 50 टक्के आरक्षणात आम्हाला सामावून घेण्याची तयारी सरकारने करावी. अनेक तरुणांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. या नियुक्त्या करण्यात याव्यात, अन्यथा पुढे आमची आंदोलने उग्र झाल्यास त्याला सरकार जबाबदार असेल, असा इशारा पवार यांनी दिला. या आरक्षणाबाबत 25 जानेवारीला न्यायालयात सुनावणी होणार आहे.
प्रमुख मागण्या -
- 25 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीत सरकारने मराठा आरक्षण टिकवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करावेत. 50 टक्क्यांपेक्षा अधिकचे आरक्षण असले तरी कायदेशीरदृष्टया अपवादात्मक परिस्थिती सिद्ध करून SEBC आरक्षण टिकवावे. प्रशासकीय अधिकारी किंवा विधीज्ज्ञ आणि शासन स्थगिती उठवण्यात असमर्थ ठरले, तर OBC वर्गाचे उपवर्गीकरण करून न्यायमूर्ती गायकवाड आयोगाच्या शिफारशीनुसार 50 टक्क्यांच्या आत OBC समूहात समाविष्ट करून आरक्षण द्यावे,
- कोणत्याही परिस्थितीत मराठा आरक्षणाला धक्का लागणार नाही याची दक्षता सरकारने घ्यावी.
- SEBC च्या 2185 मराठा उमेदवारांना सरकारने तत्काळ न्याय द्यावा.
- मराठा समाजातील उमेदवारांचा प्रवर्ग निश्चित करण्यासाठी येणाऱ्या अडचणी सोडवल्याशिवाय राज्यात कोणत्याही प्रकारची नोकरभरती करण्यात येऊ नये.
- EWS आरक्षणाच्या माध्यमातून चाललेली दिशाभूल थांबवावी.
- समांतर आरक्षणाच्या प्रशासकीय चुकीने अन्याय झालेल्या मराठा समाजातील महिला उमेदवारांना शासकीय सेवेमध्ये सामावून घ्यावे.
- सत्ताधारी आणि विरोधक यांनी मराठा आरक्षण राजकारण न करता मराठा आरक्षणातील चुका दुरुस्त करून न्याय द्यावा.
- सरकारी नोकरीमध्ये अनेक न्यायालयीन निर्णय आणि नियमावली, विविध शासन निर्णय याचे चुकीचे अर्थ लावण्यात आलेत. त्यामुळे राज्यातून बेरोजगार युवकांनी केलेल्या भरती पूर्व आरक्षण आणि अनुशेष संदर्भात आढावा घेण्याच्या मागणीवर शासनाने विचार करावा.
- 25 जानेवारीनंतर जर मराठा समाजाच्या आरक्षणाला धक्का लागला, तर तत्काळ संभाजीनगर येथे भव्य मेळावा घेवून त्यानंतर संपूर्ण राज्यात मेळावे घेऊन आंदोलन उभे केले जाईल.
- औरंगाबादचे नामांतर करून तत्काळ “छत्रपती संभाजीनगर” असे करावे.
- 19 फेब्रुवारी रोजी मराठा क्रांती मोर्चामार्फत संपूर्ण राज्यात शिवजयंती दिमाखात साजरी करण्यात येईल.
हेही वाचा - मराठा आरक्षण : अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली उद्या नवी दिल्लीत वकिलांची बैठक