मुंबई - अयोध्यात बुध्दविहार निर्माण व्हावे. यासाठी देशातील सर्व आंबेडकरी नेत्यांनी एकत्र होऊन लढा देणे गरजेचे आहे, असे आवाहन सुप्रसिद्ध आंबेडकरी गायक आनंद शिंदे यांनी केले आहे.
राम मंदिराच्या उभारणीसाठी जमिनीचे सपाटीकरण करताना आढळून आलेल्या प्राचीन मूर्ती व अवशेषांवरून ही बुद्धभूमी असल्याचे स्पष्ट होते. जमीन सपाटीकरणात जे प्राचीन अवशेष सापडले ते सम्राट अशोकाच्या शासन काळातील आहेत. काही लोकांनी रामजन्मभूमी परिसराचे निष्पक्ष उत्खनन करण्यात यावे, अशी मागणी यूनेस्को या जागतिक पातळीवरील संघटनेकडे केली आहे. देशातील अनेक बडे आंबेडकरी नेते हे वेगवेगळ्या पक्ष, संघटना यामध्ये विभागले आहेत. परंतू अशा वेळी सर्व आंबेडकरी नेत्यांनी एकत्र येऊन आयोध्येत सर्वात मोठे बुध्दविहार व बौध्दअवशेष, मूर्तीचे जतन करण्यासाठी संग्राहलय उभे करावे, अशी प्रमूख मागणी घेऊन सर्व आंबेडकरी नेत्यांनी, भिमबांधवांनी व्यापक लढा उभा करुन आपला अधिकार मिळवला पाहिजे, असे आवाहन शिंदे यांनी केले आहे.
अयोध्येत सापडलेले प्राचीन अवशेष बौद्ध धम्माशी संबंधित असल्याचा दावा ऑल इंडिया मिल्ली काऊन्सिलचे सरचिटणीस कालिक अहमदखान यांनीसुद्धा केला आहे.
अयोध्येतील विनीत कुमार मौर्य यांनी २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करून वादग्रस्त स्थळाखाली अनेक अवशेष गाडले गेलेले आहेत, ते सम्राट अशोक काळातील आहेत आणि त्याचा संबंध बौद्ध धम्माशी आहे. बाबरी मशिदीच्या बांधकामाच्या आधी वादग्रस्त जागेवर बौद्ध विहार होते, असा दावा सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून केला होता. भारतीय पुरातत्व खात्याने केलेल्या उत्खननात रामजन्मभूमीच्या ठिकाणी स्तूप, गोलाकार घुमट, भिंती आणि खांब आढळून आले आहेत. बुद्ध विहाराची ती वैशिष्ट्ये असतात. ज्या ५० खड्ड्यांत उत्खनन करण्यात आले तेथे कोणत्याही मंदिर किंवा हिंदू बांधकामाचे अवशेष आढळले नाहीत, असा दावाही मौर्य यांनी या याचिकेत केला होता. हा दावा पुन्हा एकदा खरा ठरला आहे. कारण राममंदिर उभारणीसाठी काही दिवसांपूर्वीच जमीन सपाटीकरण करताना पुन्हा बौद्ध धर्माचे सम्राट अशोकाच्या काळातील व त्यापूर्वीचेही अवशेष सापडले आहेत. तसेच अयोध्या नव्हे तर तेथे पूर्वी साकेत नगरी होती देखील अभ्यासकांनी सिद्ध केले आहे असे शिंदे यांनी म्हटले.
महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीला मोठा इतिहास आहे. दलित पँथरचे नाव ऐकताच जातीयवादी व्यवस्थेला घाम फुटत होता. मोर्चे, आंदोलने कशी करावीत, अत्याचाराचा विरोध कसा करावा, न्याय पदरात कसा पाडून घ्यावा यांचा वस्तुपाठ आंबेडकरी चळवळीने इतर समाजाला घालून दिला आहे. राज्यातील सर्वच पक्षांत आंबेडकरी विचारधारेचे आमदार व नेते आहेत. केंद्रात सामाजिक न्याय राज्यमंत्री असलेले रामदास आठवले, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर, पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे, रिपब्लिकन पक्षाचे गवई गटाचे नेते राजेंद्र गवई तसेच रिपाइंचे सर्व गटाचे नेते, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या विचारांना मानणा-या सर्वच नेत्यांनी अयोध्येत बुद्धविहार साकारण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे.
"जो इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही", असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले होते. बाबासाहेबांच्या या विधानानुसार वागण्याची आता नितांत गरज आहे. इतिहास किंवा सांस्कृतिक, प्राचिन वारसा हा पुढच्या कैक पिढ्यांना प्रेरणा देत असतो, असे असताना अयोध्येतील बौद्ध अवशेषांच्या जपणुकीची, बौद्ध विहार उभारणीची नितांत गरज आहे. हे आपल्या हातून न झाल्यास पुढची पिढी माफ करणार नाही, हे आंबेडकरी नेत्यांनी ध्यानात घ्यावे असे देखील शिंदे यांनी बोलताना म्हटले.