मुंबई - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर आले आहेत. उत्तरप्रदेशात गुंतवणूक व फिल्म इंडस्ट्री बनावी, यासाठी चर्चा करण्यासाठी ते मुंबईत आले आहेत. यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ''मुंबईला अनेकांनी ओरबाडून नेण्याचे प्रयत्न केले, पण ते त्यांना शक्य झाले नाही. मुंबई ही मुंबई आहे'', अशी टीका त्यांनी केली आहे.
राऊत म्हणाले, ''मुंबईतील फिल्मसिटी तुम्हाला हलवता येणार नाही. आता लखनऊ येथे उभारत आहेत, नोएडा येथे उभारली त्याचे काय झाले. योगीजी तामिळनाडू, पश्चिम बंगाल येथील इंडस्ट्रीतही जातील का? की फक्त मुंबईशीच पंगा घेत आहेत? यापूर्वी अनेकांनी मुंबईला ओरबडून नेण्याचे प्रयत्न केले.''
योगी तामिळनाडूत जाणार आहेत का?
''योगी आदित्यनाथ हे साधू आहेत. नरिमन पॉइंट येथील सप्ततारांकित हाॅटेलमध्ये आहेत. अक्षय कुमार आंब्याची पेटी घेऊन गेले असतील. नोयडामधील चित्रपटसृष्टीची अवस्था काय आहे, ते सुद्धा त्यांनी सांगावे. योगी तामिळनाडूत जाणार आहेत का? ती पण मोठी चित्रपटसृष्टी आहे. त्यांचा पंगा फक्त मुंबईशी आहे का? आमच्या त्यांना शुभेच्छा. तुम्ही भिंती उभ्या कराल. पण चित्रपटसृष्टी निर्माण करणार का?'', असा प्रश्नदेखील राऊत यांनी उपस्थित केला आहे.