मुंबई - दहिसर भागातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत ( State Bank of India Dahisar ) भरदिवसा झालेल्या दरोडा आणि खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा एमएचबी पोलिसांनी ( MHB Police Station ) केला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना दहिसर येथून अटक केली आहे. तसेच मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अवघ्या 8 तासात खून आणि दरोड्याच्या घटनेची उकल करण्यात यश आले आहे.
दरोडेखोरांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या दहिसर शाखेत घुसून लुटमारीच्या उद्देशाने गोळीबार केला ( Thieves Firing ) होता. बँकेवर दरोडा टाकून अडीच लाखांनी भरलेली बॅग लुटून चोरटे पसार झाले आहेत. तपासासाठी मुंबई पोलिसांची 8 पथके तैनात करण्यात आली होती. अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीण पडवळ यांना मिळालेल्या माहितीनुसार, एमएचबी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एसव्ही रोड, दहिसर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या दहिसर शाखेत ( Robbery on State Bank of India ) बुधवारी दुपारी साडी तीन वाजता २ मुखवटा घातलेले चोरटे घुसले होते.
![चोरटे सीसीटीव्ही कैद](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/90-mh-mh10066_30122021084800_3012f_1640834280_411.jpg)
गोळीबारात एकाच मृत्यू, एक जखमी
संदेश गोमरे नाव्याच्या व्यक्तीने काउंटरवर रोख रक्कम ठेवलेली बॅग चोरट्यांनी उचलण्याचा प्रयत्न केला. संदेशने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता एकाने संदेशच्या छातीत गोळी झाडली. त्याचवेळी दुसऱ्या साथीदाराने सुरक्षा रक्षकावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो थोडक्यात बचावला. परंतु त्याच्यावरही हल्ला करण्यात आला. दोन्ही कर्मचारी जखमी झाल्यानंतर हल्लेखोरांनी काउंटरवर ठेवलेल्या पिशव्या घेऊन मीरा रोडच्या दिशेने पायी पळ काढला. घटनेची माहिती मिळताच मृत संदेश गोमरे हा विरार येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तो बँकेत खाजगी कर्मचारी म्हणून काम करत होता. जखमी अवस्थेत त्यांना शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांचा मृत्यू झाला. सुरक्षा रक्षकावर उपचार सुरू आहेत.
![चोरटे सीसीटीव्ही कैद](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/90-mh-mh10066_30122021092301_3012f_1640836381_797.jpg)
चोरट्यांच्या चप्पलेच्या आधारे तपास -
अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीण पडवळ आणि उत्तर मुंबई प्रादेशिक विभागाचे डीसीपी विशाल ठाकूर यांच्यासह संपूर्ण झोनचे पोलीस पथक घटनास्थळी हजर झाले. दरोड्याच्या घटनेचा तपास करण्यासाठी अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली 8 पथके तयार करण्यात आली होती. मुंबईच्या वेगवेगळ्या दिशेने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत होते. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी श्वानपथकाची मदत घेतली. लुटारूंनी पलायन करताना त्यांच्या पायातील चप्पल सोडून दिली होती. त्याआधारे पोलिसांना आरोपीपर्यंत पोहोचण्यात यश आले.