मुंबई - लॉकडाऊन सुरू झाला आणि अवघी मुंबई ठप्प झाली. रेल्वेसेवा बंद, बस सेवेवरही सामान्य जनतेस बंदी होती. यासोबतच खासगी टॅक्सी ड्रायव्हर व इतर टॅक्सी सेवाही पूर्णपणे बंद होत्या. लॉकडाऊनच्या काळात रोजगार बंद असल्यामुळे खासगी टॅक्सी चालक आर्थिक संकटात आले आहेत. याबाबत ईटीव्ही भारतने टॅक्सी चालकांशी साधलेला संवाद...
सध्या मुंबईत 58 हजार टॅक्सी या सेवेत आहेत. जवळजवळ 50 हजारहून अधिक कुटुंब मुंबई टॅक्सीवर आपले पोट भरत आहेत. मिशन बिगीन अगेन असे म्हणत काही प्रमाणात टॅक्सीसेवा परत सुरू झाली. परंतू, लॉकडाऊनच्या दोन महिन्यांहून अधिकच्या काळात रोजगार नसल्यामुळे आवक शून्य झाली होती. टॅक्सीचा व्यवसाय म्हणजे हातावरच पोट. चाकरमान्यांसारखा महिन्याच्या महिन्याला पगार मिळत नाही. त्यामुळे दैनंदिन होणाऱ्या कमाईवर घर चालत असे. परंतू, लॉकडाऊनमुळे तेही कठीण झाले आहे.
सध्या मुंबईत लोकल गाड्या सुरू झाल्या नाहीत, पण मेल गाड्या धावत आहेत. अशा परिस्थितीत टॅक्सीची मुंबईतील विविध टर्मिनसवर जाण्याची मागणी अचानक वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून या भागात ऑटोपेक्षा अधिक टॅक्सी दिसत आहेत. अशाच एका टॅक्सी चालकाने सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून तो वसई-विरारमधील कुर्ला, वांद्रे किंवा सीएसटी येथे बऱ्याच प्रवाशांना घेऊन गेला आहे. लोकल बंद पडल्यामुळे मेल ट्रेन व फ्लाइटने जाणाऱ्यासाठी इतर कोणताही पर्याय नाही. लॉकडाऊनमुळे संपूर्ण व्यवसाय सुमारे अडीच महिन्यांपासून बंद असल्याने गेल्या महिन्यात अनेक टॅक्सी चालक आपापल्या गावी गेले आहेत.
दुसरा टॅक्सी चालक हा मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. गेल्या 27 वर्षापासून मुंबईत वास्तव्य करत आहेत. लॉकडाऊनमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीमुळे तोही त्रस्त झाला आहे. पण तोही प्रवासी मिळण्याच्या आशेने घराबाहेर पडला. लवकरच सामान्य स्थिती येईल, अशी त्याला अपेक्षा आहे.