मुंबई - पूजा चव्हाण प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात माजी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्याची मागणी करणारी याचिका दाखल झाली आहे. या याचिकेत पुणे पोलिसांच्या तपासावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. इंडिया अगेन्स्ट करप्शन या संस्थेचे सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी याचिका दाखल केली आहे. पुढील आठवड्यात या याचिकेवर सुनावणी अपेक्षित आहे.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधक असा वाद रंगत असतानाच आता मुंबई उच्च न्यायालयात संजय राठोड यांच्याविरोधात फौजदारी याचिका दाखल करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी अॅड. आर. एन. कछवे यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे. यात माजी वनमंत्री संजय राठोड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणी पुण्याच्या वानवडी पोलिसांच्या तपासावरही याचिकेतून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. वानवडी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी आपला तपास योग्य पद्धतीने केला नसून त्यांनी गुन्हेगारांविरोधात गुन्हा नोंदविण्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही याचिकेतून करण्यात आला आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती एस.एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या खंडपीठासमोर पुढील आठवड्यात सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे.