मुंबई - गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यातील कमी पटसंख्या असलेल्या ३ हजार ३७ शाळा बंद (School Closed) करणार असल्याची चर्चा सुरू होती. अखेर आज शालेय शिक्षण विभागाने याबाबत खुलासा करत शाळा बंद करण्याच्या चर्चेला फुलस्टॉप लावलेला आहे. राज्यातील कोणत्याही कमी पटसंख्या (Fewer Attendance School) असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही, अशी माहिती शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा (Vandana Krishna) यांनी दिली आहे.
- शाळा बंद करण्याचा निर्णय नाही -
केंद्र शासन पुरस्कृत समग्र शिक्षा योजनेअंतर्गत ज्या वस्तीपासून १ किंवा ३ किमी अंतरापर्यंत शाळा उपलब्ध नसेल अशा वस्तीतील विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी त्यांना जवळच्या शाळेपर्यंत जाण्यासाठी वाहतूक सुविधा किंवा वाहतूक भत्ता उपलब्ध करून देण्यात येत आहे. सदर केंद्र पुरस्कृत योजना काही वर्षांपासून सुरू असून त्यानुसार विद्यार्थ्यांना दरवर्षी वाहतूक भत्ता देण्यात येतो. मात्र अद्यापपर्यंत वाहतूक भत्ता दिल्यामुळे कोणतीही शाळा बंद करण्यात आलेली नाही, असे शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी स्पष्ट केले आहे. राज्य शासन कमी पटसंख्या असलेल्या ३ हजार ३७ शाळा बंद करणार आहेत अशी माहिती प्रसारमाध्यमांवर आली होती. मात्र, ही माहिती पूर्णपणे चुकीची आहे. कोणत्याही कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही, अशी माहिती कृष्णा यांनी दिली आहे.
- शुद्धीपत्रकान्वये सुधारणा करण्यात आली -
राज्यात ३ हजार ७३ वस्त्यांपासून जवळ शाळा उपलब्ध नसल्याने त्या वस्त्यांतील विद्यार्थ्यांना सदर योजनेच्या लाभासाठी पात्र ठरवण्यात आले आहे. सदर शासन निर्णयामधील काही वस्तींपासून शाळांच्या अंतराचा उल्लेख चुकीचा करण्यात आला होता, त्यात ९ डिसेंबर २०२१ च्या शासन शुद्धीपत्रकान्वये सुधारणा करण्यात आली आहे. त्यात वास्तविक अंतर दर्शविण्यात आले आहे. सदर योजनेमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेपर्यंत पोहचण्यास मदत मिळत आहे. कोणतीही कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा सदर शासन निर्णयाचा उद्देश नाही. केंद्र शासनाच्या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी सदर शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. असाच शासन निर्णय दरवर्षी निर्गमित करण्यात येत असल्याचेही कृष्णा यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.
- दहिसरमध्ये आंदोलन -
पसरलेल्या या माहितीवरून दहिसर चेक नाक्याजवळ श्रमजीवी संघटना महाराष्ट्र ( Shramajivi Sanghatana Agitation in mumbai ) तर्फे आज (मंगळवार) आंदोलन करण्यात आले. यादरम्यान श्रमजीवी संघटनेच्यावतीने शाळेत शिकणारी शेकडो लहान मुले दहिसर चेकनाक्यावरून बकऱ्या घेऊन मंत्रालयाकडे जात असताना मुंबई पोलिसांनी त्यांना चेकनाक्यावरच अडवले. या सर्व आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तब्बल पाच तासानंतर त्यांना सोडण्यात आले.