मुंबई - आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात प्रथम क्रमांकाचा पंच असलेल्या प्रभाकर साईल याने पैशाचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला होता. या संदर्भात एनसीबीने व्हिजिलन्स कमिटीने साईल यांना चौकशीला बोलावले आहे. या टीमचे प्रमुख असलेले ज्ञानेश्वर सिंग हे मुंबईला पोहोचले असून, याबाबत प्रभाकर साईलचा जबाब सोमवारी नोंदवला आहे.
याआधी प्रभाकर साईलने एक व्हिडिओ प्रसारित करत वानखेडेंनी आर्यनच्या सुटकेसाठी २५ कोटी रुपये खंडणी मागितल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाची दिल्लीच्या एनसीबी टीमकडून चौकशी करण्यात येत आहे. प्रभाकरला काही दिवसांपूर्वीच नोटीस पाठवल्याचा दावा एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी केला होता. तो न आल्याने एनसीबीने मुंबई पोलिसांनाही पत्र लिहिलं होतं. आज (सोमवारी) प्रभाकरला चौकशीला सामोरे जाण्याची शक्यता आहे.
![Dnyaneshwar singh](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/19-mh-mum-bandra-mh10066_08112021152859_0811f_1636365539_478.jpg)
साईलने बनवले अॅफीडेव्हीट
ड्रग्ज प्रकरणातील खंडणीचा प्रकार प्रभाकर साईलच्या आरोपानंतरच पुढे आला आहे. त्यामुळे प्रभाकरचा जबाब महत्वाचा मानला जात आहे. प्रभाकरने याबाबत एक अॅफिडेव्हिटही तयार केले आहे. त्यामुळे प्रभाकरच्या चौकशीनंतर एनसीबी कोणते पाऊल उचलणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तसेच के. पी. गोसावी, सॅम डिसोझा, मनिष भानूशाली यांचे जबाबही महत्वपूर्ण आहेत. ज्ञानेश्वर सिंग यांनीही गरजेनुसार प्रत्येकाला बोलवले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
हेही वाचा - आर्यन खान ड्रग्ज प्रकरण : आज मला उपस्थित राहता येणार नसल्याने पुढील तारीख द्या; शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानीचे एसआयटीकडे मागणी