मुंबई - वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंग प्रकरणात समन्स पाठवण्यात आले आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलकडून रश्मी शुक्ला यांना समन्स पाठवला आहे. फोन टॅपिंग प्रकरणामुळे रश्मी शुक्ला यांच्यासमोरील अडचणी वाढल्याचे दिसतंय.
SID मध्ये कार्यरत असताना रश्मी शुक्ला यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत, मंत्र्यांचे बेकायदेशीरपणे फोन टॅप केल्याचा रश्मी शुक्ला यांच्यावर आहे. या प्रकरणी रश्मी शुक्ला यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानी हे समन्स पाठवण्यात आले आहे. समन्समध्ये रश्मी शुक्ला यांना 28 एप्रिल रोजी सायबर सेल स्टेशनमध्ये जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
फोन टॅपिंग प्रकरणामुळं राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. याप्रकरणी 27 मार्च रोजी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी एक अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केला होता. या अहवालानंतर अज्ञातांविरोधात विविध गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्याच्या अनुषंगाने आता रश्मी शुक्ला यांचा जबाब नोंदवला जाणार आहे. रश्मी शुक्ला यांना बुधवारी सकाळी 11 वाजता सहायक पोलीस आयुक्त एन. के. जाधव यांच्यासमोर जबाब नोंदवायचा आहे.
रश्मी शुक्ला यांच्यावर आरोप काय?
रश्मी शुक्ला या एसआयडी मध्ये कार्यरत असताना त्यांनी आपल्या पदाचा वापर करत काही मंत्र्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. याप्रकरणी रश्मी शुक्ला यांनी माफी देखील मागितली होती. जितेंद्र आव्हाड यांनी याप्रकरणी काही दिवसांपूर्वी आपलं मत व्यक्त केलं होतं त्यांच्या म्हणण्यानुसार 'हे प्रकरण गंभीर आहे केंद्राकडून फोन टॅपिंगच्या काही सूचना आहेत. या सूचनांमध्ये राष्ट्र घातक कृत्य करणारे, तसेच दहशतवादी संघटनेशी संबंध देशातली शांतता भंग करणाऱ्या व्यक्तींचे फोन टॅप होऊ शकतात. रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंगच्या चुकीच्या परवानग्या घेतल्या आहेत. यात अनेक मंत्र्यांचे फोन टॅप करण्यात आले आहे, हा राईट टू प्रायव्हसीचा भंग आहे"
हेही वाचा : दिलासा! नागपुरात बाधितांच्या तुलनेत बरे झालेले रुग्ण अधिक