नवी मुंबई : नवी मुंबई भाजपमध्ये दोन जेष्ठ नेत्यांमध्ये नेहमीच शीतयुद्ध सुरू असते. त्यामुळे भाजप नेत्या व बेलापूर मतदारसंघाच्या आमदार मंदा म्हात्रे ( BJP MLA Manda Mhatre ) या नेहमीच स्वपक्षाला घरचा आहेर देत असतात. पुन्हा एकदा आमदार मंदा म्हात्रे यांनी त्यांच्या पक्षात स्वार्थासाठी आलेल्या आयारामांवर टीकेची झोड उठवली ( Manda Mhatre Criticized Selfish Peoples From BJP ) आहे. स्वार्थासाठी भाजपमध्ये आलेल्यांची स्वप्नं पूर्ण होत नसल्याने हेच आयराम आता गयाराम होत आहेत, असे वक्तव्य मंदा म्हात्रे यांनी केले आहे.
मूळ भाजपचे पक्ष सोडत नाहीत
मूळ भाजपमधील एकही नगरसेवक दुसऱ्या पक्षात जात नसून, जे स्वार्थासाठी भाजपमध्ये आयाराम आले होते तेच आता त्यांची स्वप्न धुळीला मिळाल्यानंतर गयाराम होत आहेत अशी टीका बेलापूर मतदार संघाच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी केली. जे आयाराम भाजपमध्ये आले होते त्यांचा विभाग रचनेमुळे स्वार्थ सिद्ध होत नसल्याचे निदर्शनास येताच, ते भाजपला रामराम ठोकत आहेत असेही आमदार म्हात्रे यांनी म्हटले आहे.
भाजपमध्ये महिलांना सन्मान मिळत नाही
स्वतःच्या पक्षातील नेते महिलांचा सन्मान करत नाही, असे वक्तव्य करत या आधीही मंदा म्हात्रे यांनी करत भाजपवर टीका केली होती. भाजपमध्ये महिलांना सन्मान मिळत नाही अशा अर्थाने मंदा म्हात्रे यांनी भाजपवर निशाणा साधला होता.
भाजप आमदार गणेश नाईक त्यांच्या मतदार संघात काम करत नाहीत
ऐरोली मतदार संघाचे आमदार असलेले गणेश नाईक ( MLA Ganesh Naik ) हे त्यांच्या मतदारसंघांमध्ये काम करत नाहीत. त्यामुळे मला आता सिमोल्लंघन करुन नाईकांच्या मतदारसंघात जावे लागणार आणि सर्वसामान्यांची कामे करावी लागणार अशी खोचक टीका मंदा म्हात्रे यांनी केली होती. त्यावेळी ऐरोली मतदारसंघात जाऊन आगरी-कोळी लोकांसाठी खाडीकिनारी जेट्टी उभारणार असून, इतरही काम हाती घेतल्याचे त्यांनी जाहीर केलं होतं. विधानसभा निवडणुकांच्या आधी गणेश नाईक यांनी राष्ट्रवादीचा हात सोडत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळीही मंदाताई म्हात्रे यांनी त्याला कडाडून विरोध केला होता. पण पक्षाच्या भूमिकेमुळे त्याचं काहीच चाललं नाही.