मुंबई - देशभरात महिलांवर अन्याय अत्याचार होतात. या अत्याचारात उत्तरप्रदेश पहिल्या, बिहार दुसऱ्या, पश्चिम बंगाल तिसऱ्या तर पुरोगामी म्हणून ओळख असलेला महाराष्ट्र देशात चौथ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये घट झाली आहे. तरीही 'नॅशनल क्राईम ब्युरो रिपोर्ट २०२०' च्या अहवालाचे आकडे चिंताजनक आहेत. महिलांवरील अत्याचाराबाबत सरकार गंभीर असल्याचे दाखवत असले तरी आता सरकारने ही बाब खरच गंभीरतेने घेण्याची गरज असल्याचे मत महिलांच्या समस्या आणि महिलांसाठी काम करणाऱ्या सद्भावना संघटनेच्या वर्षा विद्या विलास यांनी मांडले आहे.
- महाराष्ठ्र चौथ्या क्रमांकावर -
नॅशनल क्राईम रिपोर्टच्या अहवालानुसार देशभरात २०२० मध्ये महिलांवरील अत्याचाराच्या ४ लाख घटनांची नोंद झाली आहे. त्यात सर्वाधिक अत्याचार हे उत्तर प्रदेशमध्ये ५१ हजार ९८३ नोंद झाले आहेत. त्यानंतर बिहारमध्ये ५१ हजार ११६, पश्चिम बंगालमध्ये ५० हजार २९ तर महाराष्ट्रात ३९ हजार १६२ अत्याचाराच्या घटनांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात नोंद झालेल्या एकूण घटनांपैकी किडनॅपिंगच्या ८१०३, बलात्काराच्या २०६१, हत्येच्या २१६३, हुंडाबळीच्या १९७, भ्रूणहत्येच्या १२, खून करण्याचा प्रयत्न ३२५१, दुखापत करण्याच्या ७३१० आदी घटना नोंद झाल्या आहेत.
- महाराष्ट्रातील अत्याचाराच्या घटनांमध्ये घट -
उत्तर प्रदेशमध्ये २०१८ मध्ये ६५ हजार, २०१९ मध्ये ५५ हजार ५१९ तर २०२० मध्ये ५१ हजार ९८३ घटनांची नोंद झाली. बिहारमध्ये २०१८ मध्ये ४४ हजार ४०७, २०१९ मध्ये ४५ हजार ४, २०२० मध्ये ५१ हजार ११६ घटनांची नोंद झाली. पश्चिम बंगालमध्ये २०१८ मध्ये ४५ हजार ७०६, २०१९ मध्ये ४४ हजार ७४ तर २०२० मध्ये ३९ हजार १६२ घटनांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात २०१८ मध्ये महिलांवरील अत्याचाराच्या ४५ हजार ७०६ घटना नोंद झाल्या होत्या. २०१९ मध्ये ४४ हजार ७४ घटनांची नोंद झाली. तर २०२० मध्ये या घटनांमध्ये घट होऊन ३९ हजार १६२ घटनांची नोंद झाली आहे.
हेही वाचा - आधुनिक ॲपद्वारे पोलीस पोहोचणार आरोपीच्या घरापर्यंत.. CMIS साॅफ्टवेअरचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते हस्तांतरण
- सरकारने गंभीरतेने घ्यावे -
महिलांवर अत्याचाराबाबत आकडे कमी झाले हे दाखवले असले तरी हे दाखल झालेले गुन्हे आहेत. दाखल न झालेल्या गुन्ह्यांची संख्या किती असेल? महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये महाराष्ट्र चौथा ही लाजिरवाणी गोष्ट आहे. विशेष करून पुरुषांसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. महिलांवर बलात्कार करून तिला मारून टाकायचं, तिची विटंबना करायची हे प्रकार वाढीस गेले आहेत. ही समाज विघातक प्रवृत्ती आहे. त्यावर महाराष्ट्राने विचार करण्याची गरज आहे. महाराष्ट्र पुरोगामी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राज्यात सरकार काम करत आहे. शिवाजी महाराजांनी महिलांचा सन्मान केला, ती परंपरा पुढे न्यायला पाहिजे. पुरुषांची मानसिकता बदलण्याची गरज आहे. निर्भया कांडानंतर कायदे कडक झाले, त्यांची अंमलबजावणी करण्याची गरज आहे. सरकार गंभीर असल्याचे दाखवत आहे. मात्र, त्यांना आता खरंच गंभीरतेने घेण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया सद्भावना संघाच्या वर्षा विद्या विलास यांनी दिली.
- 'बेटी बचाव बेटी चुपाव' -
मुंबईत लॉकडाऊन उघडल्यानंतर सात महिन्यात ५५० हुून अधिक बलात्कार झाले आहेत. तंत्रज्ञानही याला जबाबदार आहे. 'बेटी बचाव बेटी पढाव' या नाऱ्या ऐवजी आता 'बेटी बचाव बेटी चुपाव' असा नारा देण्याची गरज आहे, त्याशिवाय गत्यंतर नाही. राजकीय नेत्यांनी अशा घटनांचे राजकारण करू नये. स्टंटबाजी करू नये. अशा घटना घडू नये म्हणून लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि लोक यांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे वर्षा विद्या विलास यांनी म्हटले आहे.
- महिलांवरील अत्याचाराच्या घटना -
२०१८ - ४५ हजार ७०६
२०१९ - ४४ हजार ७४
२०२० - ३९ हजार १६२
हेही वाचा - महिलांच्या अत्याचारावर गृहमंत्री तोंडसुद्धा उघडेनात; चित्रा वाघ साताऱ्यात कडाडल्या