मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ला प्रकरणातील वकील जयश्री पाटील यांना आज मुंबई सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे. जयश्री पाटील यांना हा मोठा दिलासा मानला जात आहे. या प्रकरणात आणखी तीन एसटी कर्मचाऱ्यांना देखील जामीन अर्ज सत्र न्यायालयाने मंजूर केला आहे.
एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या संपावर असलेल्या 100 हून अधिक कर्मचाऱयांच्या गटाने पवार यांच्या दक्षिण मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानाबाहेर उग्र आंदोलन केले होते. यावेळी कर्मचाऱ्यांनी चपला तसेच दगडफेक केली होती. याप्रकरणी पोलिसांकडून 100 हून अधिक लोकांना अटक करण्यात आली होती.
हल्ला प्रकरणातील आणखी तीन कर्मचार्यांना जामीन मंजूर - शरद पवार यांच्या निवासस्थानी आठ एप्रिल रोजी झालेल्या प्रकरणात आज आणखी तीन आरोपींना सत्र न्यायालयातून जामीन मंजूर झाला आहे. आरोपी संदीप गोडबोले, मनोज मुदलीयार आणि अजित मगरे यांना आज मुंबई सत्र न्यायालयाने जामिन मंजूर केला आहे. या पूर्वी 104 एस टी कामगाराना जामीन मंजूर करण्यात आला होता. या आंदोलनातील सर्व आरोपींना जामीन मिळाला आहे.
हा तर ट्रेलर पिक्चर आणखी बाकी आहे - हा तर ट्रेलर आहे पिक्चर आणखी बाकी आहे, असे म्हणत अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केल्यानंतर जयश्री पाटील यांनी राज्य सरकार विरोधात पुन्हा डरकाळी फोडली आहे. जयश्री पाटील म्हणाल्या की, राज्य सरकार तर्फे करण्यात आलेल्या कारवाईमध्ये कुठल्याही प्रकारचे पुरावे मिळाले नाही. वकील गुणरत्न सदावर्ते यांनी स्वतःच्या कष्टाने मिळवलेले मानप्रतिष्ठा आणि पैसा इतर कोणत्याही मार्गाने मिळवला नसल्याने राज्य सरकारची गोची झाली आहे. राज्य सरकारने आम्हाला आकर्षणाचा पूर्ण प्रयत्न केला होता. मात्र, सरकार स्वतःच्या तोंडावर पडले आहे. गुणरत्न सदावर्ते कष्टकरी आणि गरीब लोकांचे वकील आहेत. राज्य सरकारमधील लवासा आणि आदर्शमधून पैसा कमावणाऱया लोकांसारखे नाही, असे देखील जयश्री पाटील यांनी अटकपूर्व जामीन अर्ज मिळाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे.
काय आहे प्रकरण? - 8 एप्रिलला दुपारी एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले होते. यावेळी जमाव आक्रमक होऊन पवार यांच्या घरावर दगड, चप्पल फेकही केली होती. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी वकील गुणरत्न सदावर्ते आणि इतर 117 एसटी कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली होती. न्यायालयाने गुणरत्न सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. तर इतर कर्मचाऱ्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.