मुंबई - इगतपुरीत मुसळधार पाऊस कोसळत असल्याने मध्य रेल्वेच्या वाहतुकीचे तीन तेरा वाजले आहे. मुंबईतून बाहेर गावी जाणाऱ्या आणि मुंबईकडे येणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या अडकून पडलेल्या आहेत. याशिवाय अमरावती एक्स्प्रेस खर्डी ते इगतपुरी स्थानकादरम्यान अडकल्याची माहिती समोर येत आहे. याशिवाय उंबरमाळी येथे रेल्वे ट्रॅकमध्ये पाणी भरल्याने अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.
इगतपुरी तालुक्यात सलग चौथ्या दिवशीही पावसाची संततधार कायम आहे. बुधवार रात्री 10 वाजताच्या दरम्यान घाटमाथ्यावरील इगतपुरी, शहर व परिसरासह कसारा घाट व पश्चिम पट्ट्यातील काही गावामध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली असून रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झालेला आहे. खर्डी ते इगतपुरी दरम्यान घाट रेल्वे मार्गावरील रेल्वे रूळावर आणि स्थानकामध्ये पाणी भरले आहे. याशिवाय मुसळधार पावसामुळे घाट विभागात दरडी कोसळण्याच्या घटना घडलेली आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून मध्य रेल्वे प्रशासनाने 10 वाजून 15 मिनिटांनी खर्डी ते इगतरपुरी रेल्वे स्थानकादरम्यानची रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली आहे. यामुळे मुंबईकडे येणाऱ्या आणि मुंबईतून जाणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या मेल-एक्सप्रेस गाड्या अडकून पडलेले आहेत.
हेही वाचा-जलयुक्त शिवार योजनेत भ्रष्टाचार; राज्य सरकारचे एसीबीमार्फत चौकशीचे आदेश
अमरावती एक्स्प्रेस अडकली-
मिळालेल्या माहितीनुसार, खर्डी ते ईगतपुरी स्थानकांदरम्यान मुंबईतून निघालेली अमरावती एक्सप्रेस अडकलेली आहेत. याशिवाय उंबरमाळी येथे रेल्वे ट्रॅकमध्ये पाणी भरल्याने अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. तसेच कसरा घाटात रेल्वे मार्गावर दरडी कोसळल्याच्या घटना सुद्धा घडलेल्या आहे. घाट विभागातील परिस्थितीवर मध्य रेल्वे प्रशासनाचे लक्ष ठेवून आहे. तसेच रेल्वेचे अभियांत्रिकी पथक आणि कर्मचारी घाट विभागात तैनात करण्यात आले आहे.
हेही वाचा-जुन्या कसारा घाटात पुन्हा कोसळली दरड; मुंबई-नाशिक महामार्ग ठप्प
मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक ठप्प-
मुसळधार पावसामुळे जुन्या कसारा घटातही दरड कोसळली आहे. त्यामुळे मुंबई- नाशिक महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. या दरडी हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. याशिवाय आता मुंबई-आग्रा महामार्गावर ललित कंपनी समोरील संपूर्ण महामार्गाच पाण्याखाली गेला असून वाहतूक ठप्प झाली आहे.