मुंबई - राज्यात पाच ते सहा दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा शिल्लक असल्याने रक्तदान करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यानी केले आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नगरसेवक समाधान सरवणकर यांनी प्रभादेवीमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात रक्तदान करणाऱ्या मांसाहारींना एक किलो कोंबडी, तर शाकाहारी व्यक्तींना पनीर देण्यात येईल, अशी ऑफर सरवणकर यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांचे आवाहन -
कोरोना विरोधाच्या लढाईत राज्यातील डॉक्टर्स, पोलीस, आरोग्य कर्मचारी आपले योगदान देत आहेत. या लढाईसाठी आवश्यक औषधे, सुविधांची कमतरता भासू नये, यासाठी शासनस्तरावर सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. परंतू राज्यातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा साठा कमी असल्याने रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सध्या महाराष्ट्रातील ३४४ रक्तपेढ्यांमध्ये १९ हजार ०५९ रक्ताच्या युनिट, प्लेटलेटच्या २ हजार ५८३ युनिट, मुंबईतील ५८ रक्तपेढ्यांमध्ये ३ हजार २३९ रक्ताच्या युनिट आणि ६११ प्लेटलेट युनिट उपलब्ध आहेत. केवळ ५ ते ६ दिवस पुरेल एवढाच हा साठा आहे. या पार्श्वभूमीवर येत्या काळात रक्ताचा तुटवडा भासू नये, यासाठी राज्यातील राजकीय, धार्मिक, सामाजिक संस्था व गृहनिर्माण सोसायटी यांनी कोरोनाविषयक काळजी घेऊन छोट्या- छोट्या रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे. स्वैच्छिक रक्तदात्यांनी देखील नजीकच्या रक्तपेढीमध्ये जाऊन रक्तदान करावे, अस आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनानुसार शिवसेना नगरसेवक समाधान सरवणकर यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. 13 डिसेंबर रोजी माहीम-वरळी विधानसभा क्षेत्रात न्यू प्रभादेवी रोडवरील राजाभाऊ साळवी मैदानात हे शिबिर होईल. या शिबिरात जे रक्तदाते सहभागी होऊन रक्तदान करतील त्यांना मांसाहरी असल्यास एक किलो चिकन आणि शाकाहारी असल्यास एक किलो पनिर दिले जाणार आहे. अशी जाहिरात सरवकर यांनी केली आहे. या जाहिरातीची सगळीकडे चर्चा होत आहे.
राज्यातील जनतेने स्वयंस्फूर्तीने रक्तदान करावे - मुख्यमंत्री
राज्यातील रुग्णालयांमध्ये रक्ताची टंचाई भासत असून राज्यातील जनतेने स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन रक्तदान करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. महाविद्यालयातील युवा वर्ग हा रक्तदानासाठी महत्त्वाचा स्त्रोत आहे. मात्र, कोविड-१९च्या प्रादुर्भावामुळे महाविद्यालये बंद आहेत. तसेच रक्तदानात अग्रेसर असणाऱ्या बऱ्याच मोठ्या कंपन्या, कॉर्पोरेट हाऊस यांच्याकडून वर्क फ्रॉम होम सुरू असल्यामुळे रक्त संकलनामध्ये अडचणी येत आहेत.
राज्यात रक्ताचा तुटवडा, शक्य त्यांनी रक्तदान करावे - दिलीप वळसे-पाटील
कोरोनाची दुसरी लाट येत असताना राज्यातील रक्तपेढीमध्ये वेगवेगळ्या रक्तगटाचा तुटवडा जाणवत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यभरात रक्तदान शिबिर घेण्याचे आवाहन केले होते. ज्या व्यक्तीला रक्तदान करणे शक्य आहे, अशा प्रत्येक व्यक्तीने आपलं कर्तव्य म्हणून रक्तदान करण्याचे आवाहन कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केले आहे.
हेही वाचा- शिरोमणी अकाली दलाच्या उपाध्यक्षांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट
हेही वाचा- 'हम आह भी भरते हैं तो हो जाते हैं बदनाम'; आरक्षणावर भुजबळ म्हणाले...