मुंबई- शहरात काही दशकांत भटक्या श्वानांची संख्या आणि दहशत वाढली आहे. पालिकेने नागरिकांना दिलासा द्यावा म्हणून या भटक्या श्वानांवर काय कारवाई केली, असा प्रश्न नगरसेवक संजय घाडी यांनी उपस्थित केला होता. यावर २०१४ पासून आतापर्यंत ८९ हजार २९९ श्वानांचे निर्बीजीकरण करण्यात आले असून त्यावर ८.६१ कोटींचा खर्च करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
मुंबईत श्वानांची संख्या वाढल्याने नागरिकांना त्रास होत आहे. नागरिकांचा लहान मुलांचा चावा घेत असल्याने, अंगावर धावून येत असल्याने भटक्या श्वानांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नगरसेवक संजय घाडी यांनी स्थायी समितीच्या बैठकीत हरकतीच्या मुद्द्याद्वारे केली होती. यावर पालिका प्रशासनाने आपले उत्तर दिले आहे. त्यात २०१४ च्या गणनेनुसार मुंबईत ९५ हजार १७२ भटके श्वान होते. २०१४ नोव्हेंबर ते २०१९ या कालावधीत सात अशासकीय संस्थांमार्फ़त ८९ हजार २९९ श्वानांचे निर्बीजीकरण करण्यात आले. दरवर्षी सरासरी १४,८८३ कुत्र्यांचे तर दररोज ४१ श्वानांचे निर्बीजीकरण करण्यात आल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. सात संस्थांवर पालिकेकडून ८.६१ कोटींचा निधी खर्च करण्यात आला आहे.
भटक्या श्वानांना पकडण्यासाठी पालिकेकडे १ वाहन, तर संस्थांकडे ३ वाहने उपलब्ध आहेत. तसेच एप्रिल २०१९ ते नोव्हेंबर २०१९ या कालावधीत पालिकेच्या श्वानदंश लसीकरण केंद्रांना ६१,२६० श्वान लसींचा पुरवठा करण्यात आला होता. तर ६ डिसेंबर २०१९ रोजीपर्यंत लसी पुरवठा करणाऱ्या कार्यालयात १५,२९९ लसींचा साठा शिल्लक असल्याची महिती पालिकेतर्फे देण्यात आली आहे.
वर्षनिहाय निर्बीजीकरण केलेल्या श्वानांची संख्या
१) २०१४- ७,२३६
२) २०१५- ६,४१४
३) २०१६- ११,९६७
४) २०१७- २४,२९०
५) २०१८- २१,८८६
६) २०१९- १७,५०६