मुंबई - कोविड रुग्णांची संख्या घटल्याने निर्बंध शिथिल केले असले तरी तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका कायम आहे. या पार्श्वभूमीवर सर्वांनी सावध आणि जबाबदारीने वागले पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले. कोविड रुग्णांसाठी दररोज ७०० मेट्रिक टन पेक्षा जास्त ऑक्सिजनची मागणी वाढल्यास पुन्हा लॉकडाऊन लावण्याचा सूचक इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
राज्यातील निर्बंध किंवा लॉकडाऊन लावताना ऑक्सिजनची लागणारी गरज हा निकष ठेवला आहे. राज्यातील कोविड रुग्णांसाठी दररोज ७०० मेट्रिक टन ऑक्सिजन लागू लागला की राज्यात लॉकडाऊन लावला जाईल. आपणास माहीत आहे की, राज्याची ऑक्सिजन उत्पादन क्षमता मर्यादित असून दररोज केवळ १३०० मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादन केले जाते. दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली तसेच ऑक्सिजनची गरजही खूप वाढली होती, त्यामुळे सुमारे ५०० मेट्रिक टन ऑक्सिजन अतिशय प्रयत्नपूर्वक इतर राज्यांतून आणावा लागला होता. दररोज ७०० मेट्रिक टन ऑक्सिजनची कोविड रुग्णांसाठी आवश्यकता भासू लागली की (सुमारे ३० हजार रुग्णांसाठी) राज्यात निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला जाईल, असा सूचक इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.
गेल्या पावणे दोन वर्षांत कोविडने खूप काही शिकवले आहे. ही लढाई आपण एकत्र मिळून लढतो आहोत, आणि मला खात्री आहे शासनाने दिलेल्या सूचना या सर्वांच्या भल्यासाठीच आहेत हे लक्षात घेऊन आपण सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी करताना, निर्बंध लावण्यात आम्हाला आनंद नसल्याचे म्हटले आहे. तसेच कोविडचा डेल्टा अवतार आपल्या आजूबाजूच्या देशांमध्ये अमेरिका, ब्रिटनमध्ये सुद्धा परत मोठ्या प्रमाणावर पसरतो आहे. अशा परिस्थितीत सगळ्या बाबतीत अतिशय काळजीपूर्वक व्यवहार खुले करावे लागत आहेत. सध्या मर्यादित प्रमाणात का होईना पण लोकल प्रवासास मान्यता दिली. आज देखील आपण हॉटेल उपहारगृह, दुकाने यांच्या बाबतीत निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. तसेच इतरही काही क्षेत्रांमधून निर्बंध शिथिल करण्याची मागणी होती आहे, आपण यावर देखील संपूर्ण काळजी घेऊन निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केले.