मुंबई : दरवर्षी जगभरात २८ सप्टेंबर रोजी जागतिक रेबीज दिन पाळण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधत मुंबई महानगरपालिकेने ( Brihanmumbai Municipal Corporation ) २८ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबर या कालावधीत भटक्या कुत्र्यांची रेबीज लसीकरण मोहीम ( Vaccination of Stray Dogs on Rabies Day ) हाती घेतली आहे. रेबीज आजाराला प्रतिबंध करण्यासाठी ही मोहीम महत्वपूर्ण ठरणार असल्याचे देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक व पशु वैद्यकीय आरोग्य खात्याचे प्रमुख डॉ. कलिम पाशा पठाण यांनी सांगितले.
लसीकरण मोहीम : रेबीज हा संसर्गजन्य रोग ( Rabies is an infectious disease ) आहे, जो श्वान आणि मांजरींसारख्या संक्रमित प्राण्याने चावल्यानंतर किंवा ओरखडल्यानंतर होतो. जेव्हा रेबीज संसर्ग झालेल्या प्राण्याची लाळ, पीडिताच्या त्वचेच्या किंवा जखमांच्या थेट संपर्कात येते, तेव्हा तो प्रसारित होऊ शकतो. रेबीज हा १०० टक्के घातक आजार असला, तरी या आजारास १०० टक्के प्रतिबंध करता येतो. हा रोग देशातील मृत्यू आणि विकृतीच्या प्रमुख कारणांपैकी नाही, परंतु सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून हा रोग निश्चितपणे ओळखला जातो. रेबीज आजार रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमे अंतर्गत रेबीज आजाराचे १०० टक्के प्रतिबंध करणे आहे. या मोहिमेत बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीतील प्राणी प्रेमी नागरिक, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राणी कल्याण संस्था देखील सहकार्य करणार असल्याचे पठाण यांनी सांगितले.
देशात दर ३० मिनिटांनी मृत्यू : देशात दरवर्षी साधारणपणे सुमारे दीड कोटी लोकांना जनावरे चावतात. तर दरवर्षी या रोगाने मृत्यू पावणार्या लोकांची संख्या सुमारे २५ ते ३० हजारांच्या दरम्यान आहे. यात ९० टक्क्यांपेक्षा जास्त प्रकरणी श्वानांचा संबंध असतो, त्यातही भटक्या श्वानांची संख्या अधिक असते. या रोगाचा प्रादुर्भाव १.७ टक्के असल्याचा अंदाज आहे. देशात दर ३० मिनिटांनी रेबीज संसर्गित मृत्यूची नोंद होते. यासाठी जागतिक रेबीज दिनाच्या निमित्ताने महापालिकेच्या पशु वैद्यकीय आरोग्य विभागाच्या पुढाकाराने आणि प्राणिप्रेमी संस्थांच्या सहकार्याने भटक्या श्वानांसाठी लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे असे डॉ. पठाण यांनी सांगितले.
पाळीव प्राण्यांना वर्षातून एकदा लस द्या : ज्यांच्या घरी पाळीव श्वान किंवा मांजर आहेत, त्यांनी वर्षातून एकदा त्यांच्या पाळीव प्राण्यास रेबीज प्रतिबंधात्मक लस देणे बंधनकारक आहे. तरी ज्यांच्या घरी पाळीव श्वान, मांजर इत्यादी पाळीव प्राणी आहेत, त्यांनी त्यांच्या पशु वैद्यकांच्या सल्ल्यानुसार वर्षातून एकदा रेबीज प्रतिबंधात्मक लस न विसरता अवश्य द्यावी, असेही डॉ. पठाण यांनी सांगितले.