मुंबई - भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून अंधेरी एमआयडीसी येथे रस्त्यावरील खड्ड्यांच्या विरोधात आंदोलन केले. मात्र हे आंदोलन करत असताना कार्यकर्त्यांकडून वाहतूक व्यवस्था बिघडली असता पोलिसांनी कारवाई करत भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला आहे. मात्र हा लाठीचार्ज माणूस असल्याचे आरोप भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलार यांनी केला.
'राज्यात शिवशाही आहे का तानाशाही?'
'पोलिसांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली. आंदोलन करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या पोलिसांच्या आणि घटनेची चौकशी करावी' अशी मागणी आमदार आशिष शेलार यांच्याकडून करण्यात आली आहे. राज्यात "शिवशाही आहे का तानाशाही?" असा सवाल त्यांनी यावेळी राज्य सरकारला केला. तसेच यापुढे मंत्रालयावर आंदोलन करताना आम्ही लाठ्याकाठ्या घेऊन आंदोलन करायचे का? असा सवाल या घटनेनंतर आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.
भाजपाचे 'सेल्फी विथ खड्डा' आंदोलन -
मुंबईसह राज्यभरात महामार्गाची अवस्था खड्डेमय झाली आहे. मुंबईतही रस्त्यावर जागोजागी खड्डे पडलेले पाहायला मिळत आहेत. यामुळे मुंबईकरांना प्रवास करताना नाहक त्रास होतो. खड्ड्यांमुळे होणारा त्रास महानगरपालिकेच्या निदर्शनात आणून देण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून "सेल्फी विथ खड्डा" असे आंदोलन सुरू करण्यात येत आहे. भाजपाचे आमदार आशिष शेलार हे आज पासून हे आंदोलन सुरू करत असून रस्त्यावर जिथे खड्डे आहेत तेथून सेल्फी काढून सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्य सरकार आणि महानगरपालिकेच्या निदर्शनास हे खड्डे आणून देणार आहेत.
महापौरांनी दिले 'असे' उत्तर -
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी भारतीय जनता पक्षाचे हे आंदोलन सकारात्मक पद्धतीने घेणार असे सांगून, जेथे 'खड्डा विथ सेल्फी' या पद्धतीने खड्डा दाखवण्यात येईल, तो खड्डा लगेचच महानगरपालिकेकडून बुजवण्यात येईल असे आश्वासन दिले आहे. तसेच खड्ड्याबाबत आंदोलन करत असताना विरोधी पक्षाने कोविडच्या परिस्थितीचे भान ठेवणे गरजेच आहे. अद्यापही कोरोना पूर्णपणे गेलेला नाही. त्यामुळे आंदोलन करताना या गोष्टीचे भान विरोधकांनी ठेवावे, असा मोलाचा सल्लाही महापौरांनी दिला आहे.
हेही वाचा - मध्यवर्ती निवडणुका लागल्या तर आमची तयारी पूर्ण - चंद्रकांत पाटील