मुंबई - गेले काही दिवसांपासून सुरु असलेल्या कर्नाटकातील राजकीय नाट्याला आज मंगळवारी अखेरीस पूर्णविराम मिळाला आहे. बहुमत चाचणीत अपयशी झाल्याने कर्नाटकातील कुमारस्वामी यांचे सरकार कोसळले आहे. काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
कर्नाटकात 'लोटस' जिंकला पण लोकशाही हरली
कर्नाटक विधानसभेमध्ये विश्वास प्रस्तावावर मतदान झाल्यानंतर कुमारस्वामी यांचे सरकार कोसळले. कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि जेडीएसचे सरकार आल्यानंतर अगदी पहिल्या दिवसापासूनच भाजपने हे सरकार पाडण्यासाठी कट-कारस्थाने सुरू केली होती. 'सत्ता हवी तर आमचीच' हा एकमेव अट्टाहास त्यामागे होता. त्यासाठी त्यांनी केंद्रातील अमर्याद सत्ता आणि पैशाचा मनमुराद वापर केला. नैतिकता धाब्यावर बसवली गेली. काँग्रेस-जेडीएसच्या आमदारांना अनेक प्रलोभने दिली. सरतेशेवटी कर्नाटकमध्ये सरकार कोसळले व लोकशाहीचा पराभव झाला. हा प्रकार अतिशय दुर्दैवी असल्याचेही त्यांनी सांगितले. कर्नाटकमधील भाजपच्या राजकीय कारस्थानांमध्ये तूर्तास 'लोटस' जिंकलाही असेल पण लोकशाही हरली हे आपले दुर्दैव आहे. अशी प्रतिक्रिया उद्वीग्न होउन अशोक चव्हाण यांनी दिली आहे.