मुंबई - शहरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रांगणात वाढत आहेत. सकाळी जमावबंदी, रात्री नाइट कर्फ्यु तर शुक्रवार ते सोमवार विकेंड लॉकडाऊन लावण्यात आला आहे. यादरम्यान दारूच्या दुकानांवर गर्दी होऊन कोरोना पसरण्याची शक्यता आहे. त्यासाठी नोंदणी केल्यावर दारू विक्रीचे लायसन्स असलेल्या दुकानदारांनी दारू घरपोच तसेच पार्सल द्यावी, असे आदेश महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी काढले आहेत.
दारू घरपोच -
मुंबईत गेल्या वर्षभरापासून कोरोनाचा प्रसार आहे. हा प्रसार दोन महिन्यापासून पुन्हा वाढू लागला आहे. जमावबंदी, नाईट कर्फ्यु तसेच विकेंड लॉकडाऊन लागू आहे. यादरम्यान वाइन शॉप उघडल्यावर तेथे प्रचंड मोठ्या रांगा लागत असल्याचे चित्र मुंबईतील अनेक भागात पाहावयास मिळाले होते. त्यामुळे पोलिसांनी ही वाइन शॉप्स बंद केली होती. आता पुन्हा ही दुकाने उघडली जाणार आहे. या दुकानांवर दारू विक्री केली जाणार नाही. मात्र, ऑर्डर देऊन पार्सल किंवा घरपोच दारू मिळणार आहे. ज्यांच्याकडे दारू पिण्याचा परवाना आहे, अशा लोकांना सकाळी 7 ते रात्री 8 दारू घरपोच मिळणार आहे. मद्य घरी पोहोचवणाऱ्या व्यक्तींने वैयक्तिक स्वच्छता आणि कोविडसंबंधीचे सर्व नियम पाळणे बंधनकारक आहे, असेही या आदेशात स्पष्ट केले आहे. तर बारमधूनही मद्य घरपोच मिळणार आहे.
काय म्हटले आहे परिपत्रकात?
1) जो अनुज्ञप्तीधारक भारतीय बनावटीचे विदेशी मद्य - स्पिरिटस, बीअर, सौम्य मद्य, वाइन या मद्य प्रकाराची विक्री करण्यासाठी अनुज्ञप्ती धारण करतो, केवळ त्या मद्य प्रकाराची विक्री करेल; फक्त परवानाधारकाने संबंधित मद्याच्या विक्रीसाठी मागणी नोंदविली तरच, परवानाधारकास अशा मद्याचे वितरण अनुज्ञेय मद्याचे परवानाधारकाच्या निवासी पत्त्यावर करता येईल.
2) आठवड्यातील सर्व दिवशी अनुज्ञप्तीधारक विदेशी मद्याची विक्री व वितरण केवळ त्याच्या अनुज्ञप्ती आवारातून करेल. तसेच, मद्य वितरणाची वेळ सकाळी ०७.०० ते रात्री ०८.०० पर्यंतच राहील. यावेळेत कोणीही मद्यपानासाठी किंवा मद्य विकत घेण्यासाठी किंवा मद्याची ऑर्डर देण्याकरिता सदर आस्थापनांवर प्रत्यक्ष जाऊ नये.
3) अशा मद्याच्या विक्रीकरिता घरपोच सेवा देण्यासाठी ज्या व्यक्तींची नेमणूक केली जाईल, त्या व्यक्ती मास्कचा वापर व वेळोवेळी हाताचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी हॅन्ड सॅनिटारझरचा वापर करतील, याची दक्षता अनुज्ञप्तीधारक घेईल.
4) राज्य शासनाने आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ (२००५चा ५३वा कायदा) किंवा राज्यात लागू असलेल्या इतर कायद्यान्वये जारी केलेले ' ब्रेक द चेन'बाबतचे आदेश अस्तित्वात असेपर्यंत हे आदेश लागू व अस्तित्वात राहतील.
5) राज्य शासनाने आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ (२००५चा ५३वा कायदा) किंवा राज्यात लागू असलेल्या इतर कायद्यान्वये जारी केलेले ' ब्रेक द चेन'बाबतचे आदेश अस्तित्वात असेपर्यंत हे आदेश लागू व अस्तित्वात राहतील.
6) उक्त आदेशान्वये सर्व संबंधितांनी तत्काळ अंमलबजावणी करावी. या आदेशाची अंमलबजावणी करण्यास कोणत्याही व्यक्तीने टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांचे विरुद्ध यथास्थिती आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५मधील कलम ५१ ते ६० व भारतीय दंड संहिता, १८६०मधील कलम १८८ आणि लागू असणाऱ्या इतर कायदेशीर तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल.