मुंबई - कोरोनाच्या संक्रमणाचा फटका पोलीस खात्याला बसला असून तब्बल आठ पोलीस अधिकारी व 32 पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. लॉकडाऊनच्या काळात कोविड 19 च्या संदर्भात 72 हजार 644 फोन कॉल 100 क्रमांकाच्या नियंत्रण कक्षावर आले असून अनधिकृत वाहतुकीचे एक हजार 51 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अनधिकृत वाहतूक प्रकरणी 11 हजार 645 जणांना अटक करण्यात आलीय. जवळपास 36 हजार 935 वाहने जप्त करण्यात आली आहेत. पोलिसांनी या काळात 2 कोटी 6 लाख 73 हजारांचा दंड वसूल केलाय.
राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून यावर उपाययोजना करण्यासाठी केंद्राकडून लॉकडाऊन वाढवण्यात आले. 22 मार्च ते 19 एप्रिल या काळामध्ये संपूर्ण राज्यात एकूण 55 हजार 393 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. क्वारंटाईनच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 567 जणांवर राज्यभरात कारवाई करण्यात आलीय. तसेच या दरम्यान पोलिसांवर हल्ला होण्याच्या 105 घटना समोर आल्या आहेत. या गुन्ह्यात 301 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
राज्यात कलम 144 व 188 नुसार पुण्यातून सर्वाधिक 8100 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड 4688 , नागपूर शहर 3287 , नाशिक शहर 3068 , सोलापूर 3551 , गुन्हे नोंदवण्यात आले असून सर्वाधिक कमी गुन्हे रत्नागिरी 55 तर अकोल्यात 57 गुन्हे दाखल झाले आहेत.
व्हिसाच्या नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी 156 परदेशी नागरिकांवर कारवाई करण्यात आली असून यामध्ये मुंबईत - 32, अहमदनगर - 29 ,अमरावती - 18, पुणे - 8, नागपूर शहर - 8, ठाणे शहर - 21, चंद्रपूर - 11, गडचिरोली - 9, नवी मुंबई - 10, तर नांदेडमध्ये 10 परदेशी नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे.