कोल्हापूर - लॉकडाऊन काळातील सर्व सामान्य ग्राहकांचे वीज बिल माफ करावे यासाठी सर्व पक्षीय आंदोलन करण्यात आले. यावेळी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात कोल्हापुरातील पंचगंगा पूल येथे पुणे- बेंगलुरु महामार्ग रोखण्यात आला. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी झाले आहेत. या वेळी जोपर्यंत वीजबिल माफ होत नाही तोपर्यंत गप्प बसणार नाही; वेळप्रसंगी कायदाही हातात घेण्याचा आंदोलकांसह शेट्टींनी इशारा दिला.
आंदोलनकांनी सरकारने दिलेले आश्वासन पाळावे आणि नागरिकांना दिलासा द्यावा, वीजबिल न भरणाऱ्या ग्राहकांचा वीज कनेक्शन सुद्धा तोडू नका, अशी मागणी करण्यात आली. आंदोलनामुळे दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली असून महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे पहायला मिळाले. महामार्गाच्या दोन्ही बाजूला दहा ते पंधरा किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत.
महाराष्ट्र शासनाने कोणत्याही घटकाला दिली नाही सवलत -
केरळ, मध्य प्रदेश व गुजरात या तीन राज्यांनी वीज बिलांमध्ये 6 महिन्यांसाठी 50 टक्के सवलत दिली आहे. कर्नाटक सरकारने रिक्षा चालक, टॅक्सी चालक, फळ भाजी विक्रेते, बांधकाम व यंत्रमाग कामगार या सर्व गरीब, कष्टकरी व रोजंदारीवर जगणाऱ्या घटकांना रोख मदत दिली आहे. मात्र, महाराष्ट्र शासनाने कोणत्याही घटकांस कोणतीही सवलत दिलेली नाही. ही बाब अत्यंत खेदजनक आहे. याउलट सक्तीने वीजबिल वसूल केले जात असून अनेक ठिकाणी कनेक्शन सुद्धा तोडली आहेत.