कोल्हापूर - कोल्हापुरातल्या शाहू मार्केट यार्ड कृषी उत्पन्न बाजार समिती येथे भरणारा जनावरांचा बाजार पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या 15 नोव्हेंबरपासून बाजार भरणार आहे. सोमवारी बाजार समितीने हा निर्णय जाहीर केला आहे. कोरोनामुळे गेल्या 7 महिन्यांपासून बाजार बंद होता मात्र, आता पुन्हा एकदा हा बाजार भरणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या सर्वच नियम आणि अटींचे पालन करून हा बाजार भरवण्यात येणार आहे. तसेच नियम मोडणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
दर आठवड्याला बाजारात 50 लाखांची उलाढाल
बाजार समितीमध्ये प्रत्येक रविवारी जनावरांचा बाजार भरत असतो. यामध्ये विविध भागातून म्हैस, गाय, बैल, शेळी, मेंढी, बकरी विकण्यासाठी शेतकरी येतात. यातून प्रत्येक रविवारी अंदाजे 50 लाखांची उलाढाल होत असते. मात्र कोरोनामुळे गेल्या 7 महिन्यांपासून बाजार पूर्णपणे बंद होता. त्यामुळे गेल्या 7 महिन्यांमध्ये 140 कोटींची उलाढाल ठप्प झाली.
मास्क न घातल्यास कारवाई
कोरोनाचा धोका अजूनही टळला नाहीये. त्यामुळे बाजार सुरू झाल्यावर पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार बाजार समितीमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मास्क तसेच सामाजिक अंतर ठेवण्याबाबत सूचना देण्यात येणार असून, नियमांचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.