औरंगाबाद - शहराच्या नामांतराला विरोध करण्यासाठी मोर्चा काढण्यात आला. मात्र त्याला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. त्यावर जे आले नाहीत त्यांना पण लक्षात ठेवू. शहराच्या अस्तित्वाच्या मुद्द्यावर सोबत नाही आले, त्यांची तर वाट लागणार आहे. कोणत्या एका पक्षाचे नाव घेत नाही. चव्हाण साहेब नांदेडला येतोय. तुमचा बँड वाजवायला येतोय, अशी टीका एमआयएम प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील ( MP Imtiaz Jalil ) यांनी केली आहे. आज ( मंगळवारी ) शहरात संभाजीनगर नामांतराच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते.
'अचानक कशी जादू झाली' : नामांतराला विरोध करण्यासाठी आम्ही एक सुरुवात केली. आम्ही संभाजी महाराजांचा अवमान करत नाही. जो इतिहास चारशे वर्षांपूर्वी काय झाले माहीत नाही. मात्र आज बेरोजगारांना रोजगार हवा आहे. युवक नोकरी मागत आहे तर तुम्ही शहराच नाव बदलून देत आहे. शहराला पाणी नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. त्यांनी आधी शहराचा विकास करू आणि नंतर नामांतर करू असे म्हणाले होते. मात्र अचानक काही दिवसात कोणती जादूची कांडी फिरवली. हे माहीत नाही. जे लोक बापाला बाप म्हणायला तयार नाही ते आम्हाला उद्धार करायला निघाले आहेत, अशी टीका जलील यांनी केली.
'आता आम्ही शांत बसणार नाही' : राजकारण करण्यासाठी आम्ही महापुरुषांची नाव घेत नाही. आधी शहराला आंतरराष्ट्रीय दर्जाचे करा. आम्ही स्वतः प्रस्ताव घेऊन तुमच्याकडे येऊ. दोन दिवस एक नेते आले. आधी म्हणाले संमतीने झाले आता म्हणतात आम्हाला माहीत नव्हत. शरद पवारजी झुट बोले कव्वा काटे. आम्ही आता तुम्ही म्हणाल तर करणार नाही, तुम्ही बस म्हणाले बसले आणि उठ म्हणाले उठले असे होणार नाही, असा इशारा खासदार जलील यांनी दिला.
'उद्धव बाबा आमच्या नादी लागू नका' : संभाजीनगरबाबत जो निर्णय घ्यायचा होता तर 2014 मधे सत्ता आली त्यावेळी का घेतला नाही. देश बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने चालेल. आम्ही मंत्री आहे आणि औरंगाबादच्या लोकांना मान्य करावा लागेल, असे वाटत असेल तर उद्धव बाबा आमच्या नादी लागू नका. ठरवायच असेल तर औरंगाबादची जनता ठरवेल. सर्व जातीचे लोक या मुद्द्यावर जोडले गेले आहेत. राजनीती सुरू आहे. आमच्यावर निर्णय लादले जात आहेत. आमच्यावर जबरदस्ती केली जात आहे, असा आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी केला.
हेही वाचा - OBC Reservation : 19 जुलैला होणाऱ्या सुनावणीमध्ये ओबीसी समाजाला दिलासा मिळेल - छगन भुजबळ