औरंगाबाद - आजारी पत्नीचा मृत्यू होताच 65 वर्षीय वृद्ध पतीने पत्नीच्या साडीनेच घरासमोरील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही ह्रदयद्रावक घटना आज पहाटे साडेतीन वाजता मुकुंदवाडीतील रामनगर भागात घडली आहे. विमलबाई भाऊसाहेब गोसावी (६० ) व भाऊसाहेब गोसावी (६५) असे मृत पती-पत्नीचे नाव आहे.
मृत भाऊसाहेब हे महाराष्ट्र जनरल कामगार युनियन व असोसिएशन ऑफ इंजिनिअरिंग वर्कर्स संघटनेचे माजी सचिव होते. पती, मुलगा,दोन नातवंडासोबत ते राजनगर भागात वास्तव्यास होते.
कामगारांच्या हक्कासाठी त्यांनी केली होती आंदोलने-
भाऊसाहेबांनी कामगारांच्या हक्कासाठी अनेक आंदोलने केली होती. सध्या ते निवृत्त असल्याने घरीच होते. अनेक धार्मिक कार्यात ते अग्रेसर असायचे.त्यांची पत्नी विमलबाई या क्षयरोगाने आजारी होत्या. आज पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मुलगा घराच्या वरच्या मजल्यावर झोपला होता. मात्र त्याला न उठविता पत्नीच्या निधनाची बातमी त्यांनी पैठण तालुक्यात राहणाऱ्या पुतण्याला फोनवरून कळवली. भाऊसाहेबांनी घरासमोरील झाडाला पत्नीच्या साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
त्यानंतर पैठण येथून पुतण्याने फोन करून भाऊसाहेब यांच्या मुलाला आईच्या निधनाची बाब सांगितली. त्याने खाली जाऊन पाहिले असता आईचा मृत्यू झाला होता. तर त्याला वडिलांनी गळफास घेतल्याचे दिसले. या दुर्दैवी घटनेने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे .या प्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हवलंदार एस. ए. मनगटे करीत आहेत.