अमरावती : राज्यातील शेतकऱ्यांचे बिकट प्रश्न सुटावेत राज्यावर आलेली अनेक संकटे दूर व्हावीत या उद्देशाने आम्ही मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आमच्यावर आज टीका करणारे राज ठाकरे हे औरंगाबादमध्ये भडकाऊ भाषण करतात मात्र त्यांच्यावर कुठलीच कारवाई होत नाही. राज ठाकरे यांच्या सभा ह्या मॅच फिक्सिंगसारख्या असतात, असा आरोप बडनेराचे आमदार रवी राणा यांनी केला आहे.
आमच्यावर होणाऱ्या अन्यायाबाबत राज ठाकरे गप्प : आम्हीसुद्धा हिंदू आहोत. मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठण करणे काही गैर नव्हते, मात्र शिवसैनिकांनी आमचा तीव्र विरोध केला. हनुमान चालीसा पठणासाठी आलेल्या महिला खासदारांना कारागृहात डांबण्यात आले. आम्ही हिंदू असून, आमच्यावर अन्याय झाला असतानाही राज ठाकरे आमच्यावर होणाऱ्या अन्यायाबाबत गप्प आहेत. मात्र, आज त्यांनी पुण्यात सभा घेऊन आमच्या बाबत जे काही वक्तव्य केले ते चुकीचे असल्याचे आमदार रवी राणा म्हणाले.
मातोश्री हिंदूंचे श्रद्धास्थान : मातोश्री ही मशीद नाही हे मला ठावूक आहे, खरंतर मातोश्री हे सर्व हिंदूंचे श्रद्धास्थान आहे. यामुळेच हिंदूंनी मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठण करणे हा गुन्हा नाही. औरंगाबादमध्ये औरंगजेबाच्या कबरीवर चढविली जातात, तेव्हा कुठलीही कारवाई होत नाही त्यावेळी राजकारण आडवे येते.
देशात दोनच हिंदुहृदय सम्राट : आम्ही ठाकरे कुटुंबात नव्हे, तर सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलो म्हणून आमच्यावर अन्याय केला जातो. आज हिंदूंवर अन्याय होत असताना राज ठाकरे योग्य भूमिका घेत नाही. खरं तर या देशात बाळासाहेब ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोनच हिंदुहृदय सम्राट आहेत, असे आमदार रवी राणा म्हणाले.
हेही वाचा : नवनीत राणा अटकप्रकरणी लोकसभेच्या विशेषाधिकार समितीची आज बैठक