अमरावती - जिल्ह्यातील नांदगाव खांडेश्वरमधील जैन इंडस्ट्रीजच्या आवारात पणन महासंघाकडून आधारभूत किमती योजने अंतर्गत कापसाची खरेदी सुरू आहे. मात्र, या खरेदीमध्ये शेतकऱ्यांची लूट करण्यात येत असल्याचे दिसत आहे. ग्रेडरच्या सूचनेनुसार गाडीमागे 50 किलो ते एक क्विंटलपर्यंत कापूस काढून घेण्याचा नियमबाह्य प्रकार या खरेदी केंद्रावर सुरू असल्याचे उघडकीस आले आहे.
ग्रेडर गाडीमागे कापसाची किती कटती घ्यायची, हे फोल्डरवर लिहून देत असे. त्यानुसार काट्यावर वजन करणारे कर्मचारी रिकाम्या गाडीचे तेवढेच वजन वाढवून काटा पट्टीवर लिहित असल्याने कापूस कटतीच्या नावावर शेतकऱ्यांकडून तेवढा कापूस जास्त घेत असल्याचा प्रकार सहाय्यक निबंधकांच्या लक्षात आला. प्रत्यक्ष पंचनामा करतेवेळी उभ्या असलेल्या रिकाम्या गाडीचे पुन्हा वजन केले असता राजू दोनदकर यांचे रिकाम्या गाडीचे वजन प्रत्यक्ष ३७.४० क्विंटल भरले. परंतु, काटा पावतीवर मात्र ३७.८५ किलो वजनाची नोंद असून शंकर इखार यांचे गाडीचे वजन १८.९५ क्विंटल भरले. परंतु, काटा पावतीवर मात्र १९.८५ क्विंटल वजनाची नोंद करण्यात आली.
हेही वाचा... नालासोपाऱ्यात तलवारी घेऊन गुंडांचा राडा, एकास अटक
चिंतामण टिळक यांचे गाडीचे वजन २२.७५ क्विंटल भरले असता काय पावतीवर मात्र २२.८५ क्विंटल लिहिण्यात आले. ग्रेडर ने लिहून देण्यात आलेल्या कटतीचा आकडा सोडून टाकण्यात आला, असे सहायक निबंधक यांच्या पंचनाम्यामध्ये नमूद असल्याने या केंद्रावर कापूस खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचे दिसून येते. याबाबतीत काट्यावर वजनाचे माप करणारे कर्मचारी समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही . ग्रेडर ने सांगितल्या प्रमाणेच आम्ही वजनाची नोंद घेतो असे त्यांनी सांगितले. घटनास्थळी झोनल अधिकारी दिवाकर कांबळे सुद्धा उपस्थित झाले.
या गैरप्रकारा संदर्भात शेतकऱ्याच्या तक्रारीवरून तालुक्यातील सहकार नेते अभिजीत ढेपे, बाजार समिती सभापती विलास चोपडे, संचालक वसंत मानके यांनी ३० जून रोजी कापूस खरेदी केंद्राला भेट देऊन कापूस कटती च्या नावाखाली सुरु असलेला गैरप्रकार उघड केला. या प्रकाराची माहिती सहायक निबंधक यांना देण्यात आली. घटनास्थळी सहायक निबंधक आल्यावर सुरू गैरप्रकार त्यांचे लक्षात आले आणि घटनेचा पंचनामा केला.