नवी दिल्ली - विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात युवा यष्टीरक्षक ऋषभ पंत याचा पत्ता कट करण्यात आला आहे. निवड समितीने अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक याला संधी दिली आहे. पंत याला संघात स्थान न दिल्याने माजी फलंदाज सुनील गावस्कर हैराण झाले आहे. गावस्कारांच्या मते, पंतने त्याच्या यष्टीरक्षणात आणि फलंदाजीत बऱ्याच सुधारणा केल्या आहेत. त्याला संधी देण्याची गरज होती.
गावस्कर पुढे म्हणाले, की पंतने केवळ आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केली असे नव्हे तर या आधीच्या कसोटी आणि वनडेत चांगली कामगिरी करुन दाखविली आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये त्याने २४५ तर कार्तिकने १११ धावा केल्या आहे. मध्यक्रमात एका डावखुऱ्या फलंदाजाची गरज आहे. त्याला संधी दिली असती तर विरोधी संघातील गोलंदाजांना बॉलिंगमध्ये बदल करताना अडचणी आल्या असत्या.
गावस्कर पुढे म्हणाले, की जर महेंद्र सिंह धोनी आजारी पडला तर त्याच्या जागी योग्यच खेळाडू असला पाहिजे. कार्तिकला उत्तम यष्टीरक्षणामुळे त्याची संघात निवड करण्यात आली आहे. विजय शंकरच्या बाबतीत ते बोलताना म्हणाले की, तो एक बहुपयोगी खेळाडू आहे. त्याच्या आत्मविश्वासात वाढ होत आहे. फलंदाज आणि गोलंदाजी सोबत चांगले क्षेत्ररक्षणही करतो.