पैठण (औरंगाबाद) - शहरातील शासकीय ग्रामीण रुग्णालयात पुढील आठवड्यापासून तीस ऑक्सिजन बेडसह अन्य वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सदस्य विलास भुमरे यांनी शासकिय रुग्णालयाची पाहाणी करत आढावा घेतला. या सुविधा उपलब्ध झाल्यावर करोनाच्या गंभीर रुग्णांना औरंगाबादला जाण्याची गरज पडणार नसल्याची माहिती प्रपाठक डॉ. भारत चव्हाण यांनी दिली.
तालुक्यात एक महिन्यापासून तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये सतत वाढ होत आहे. सध्या तालुक्यात ६९९ सक्रिय रुग्ण असून, गंभीर २९२ करोना रुग्णांवर औरंगाबाद येथील खासगी व शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. पैठण तालुक्यात ऑक्सिजनच्या बेडची उपलब्धता नसल्यामुळे उपचारांमध्ये अडचणी येत होत्या.
त्यामुळे करोनाच्या एकूण रुग्णापैकी ३७ टक्के गंभीर रुग्णांवर औरंगाबाद येथे उपचार करावे लागत आहे. रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांच्या प्रयत्नातून पैठण ग्रामीण रुग्णालयात 30 ऑक्सिजन बेड उपलब्ध होणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी दूध संघाचे उपाध्यक्ष नंदलाल काळे, डॉ. संदीप रगडे, डॉ. पंडित किल्लारीकर, विलासबापू प्रतिष्ठानचे शेखर शिंदे, नगरसेवक भूषण कावसानकर, प्रारब्धचे अध्यक्ष शिवराज पारिक, नामदेव खराद, अमोल जाधव यांची उपस्थिती होती.