मुंबई - उद्योग विभागाच्यावतीने मॅग्नेटीक महाराष्ट्र 2.0 चा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी शुभारंभ करण्यात आला. यावेळी विविध देशांचे वाणिज्यदूत, गुंतवणूकदार. उद्योगपती ऑनलाईन शुभारंभाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी विविध 12 देशांतील गुंतवणुकदारांसोबत 16 हजार 30 कोटी रुपयांचे सामंजस्य करार देखील करण्यात आले.
यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, कोरोनाशी लढताना आज आपण 16 हजार कोटींचे सामंजस्य करार करून महाराष्ट्रावर जो विश्वास दाखवला आहे तो आम्ही सार्थ करु. तसेच यापुढे देखील राज्यात येणाऱ्या लहान मोठ्या उद्योगांना त्यांचे उद्योग सुरू करण्यात कोणत्याही अडचणी येऊ दिल्या जाणार नाहीत, असेही ते म्हणाले.
अमेरिका, चीन, दक्षिण कोरिया, सिंगापूर या देशातील तसेच काही भारतीय गुंतवणुकदारांसोबत हे करार करण्यात आले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उद्योगमंत्री यांच्या उपस्थित व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
सामंजस्य करार झालेल्या कंपन्या आणि गुंतवणूक रक्कम -
एक्सॉन मोबिल(अमेरिका)ऑइल अँड गॅस- इसाम्बे, रायगड 760 कोटी
हेंगली (चीन) इंजिनिअरिंग- तळेगाव टप्पा क्रमांक-2, पुणे 250 कोटी आणि 150 रोजगार
असेंडास (सिंगापूर) लॉजिस्टिक- चाकण-,तळेगाव, पुणे, भिवंडी, ठाणे 560 कोटी
वरूण बेव्हरिजेस (भारत) अन्न प्रक्रिया- सुपा, अहमदनगर 820 कोटी
हिरानंदानी ग्रुप (भारत) लॉजिस्टिक- भिवंडी- चाकण तळेगाव 150 कोटी आणि 2500 रोजगार
असेट्ज (सिंगापूर)डेटा सेंटर- टीटीसी, ठाणे- महापे 1100 कोटी आणि 200 रोजगार
इस्टेक (दक्षिण कोरिया) इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम डिझाईन - रांजणगाव, पुणे 120 कोटी आणि 1100 रोजगार
पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्यूशन जेव्ही विथ फोटोन ( चीन) ऑटो-तळेगाव 1000 कोटी रोजगार 1500
इसाम्बे लॉजिस्टिक (भारत) लॉजिस्टिक- रायगड 1500 कोटी आणि रोजगार 2500
रॅकबँक(सिंगापूर) डेटा सेंटर- ठाणे, हिंजेवाडी, पुणे 1500 कोटी
युपीएल( भारत) केमिकल- शहापूर, रायगड 5000 कोटी आणि रोजगार 3000
ग्रेट वॉल मोटर्स (चीन) ऑटोमोबाईल तळेगाव- पुणे 3770 कोटी आणि 2042
वर्ल्ड असोसिएशन ऑफ इन्व्हेस्टमेंट प्रमोशन एजन्सीज (डब्ल्यूएआयपीए) आणि यूएस इंडिया पार्टनरशिप फोरम (यूएसआयएसपीएफ) सह द्विपक्षीय भागीदारी करारावर यावेळी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. मुकेश आघी आणि वेणुगोपाल रेड्डी यांनी स्वाक्षऱ्या केल्या. डब्ल्यूएआयपीएचे बोस्तजन स्कलार यांनी देखील डब्ल्यूएआयपीएच्या वतीने स्वाक्षरी केली. तर चीनचे भारतातील राजदूत वेडोंग सन, सिंगापुरचे वाणिज्यदूत गॅव्हीन चे, डेव्हिड यांनी देखील आपले विचार यावेळी मांडले.
इतर देशांच्या तुलनेत आपल्या राज्यात परकीय गुंतवणूक वाढ होईल आणि रोजगार उपलब्ध होईल, असा विश्वास यावेळी उद्योग मंत्री श्री. सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.
दरम्यान, या उद्योगांसाठी राज्यात सुमारे चाळीस हजार हेक्टर जमीन राखीव ठेवलेली आहे. विविध परवान्यांऐवजी आता 48 तासांत महापरवाना दिला जाणार आहे. याशिवाय औद्योगिक कामगार ब्यूरो सुरू केला जाणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. उद्योग विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, वेणूगोपाल रेड्डी आणि एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनबलगन यावेळी उपस्थित होते.