मुंबई- कोरोना संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली होती, परंतु मागील 3 महिन्यात कौशल्य विकास विभागाने जिल्ह्या जिल्ह्यात आयोजित केलेल्या ऑनलाईन रोजगार मेळाव्यामुळे आणि महास्वयम वेबपोर्टलच्या साहायाने तब्बल 17 हजार 715 बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात आला आहे. तर, 3 महिन्यात कौशल्य विकास विभागाच्या विविध व्यसपीठांवरून 1 लाख 72 हजार 165 बेरोजगारांनी रोजगारासाठी नोंदणी केली आहे, अशी माहिती राज्याचे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
तसेच, नोंदणी केलेल्या सर्व उमेदवारांना नोकरी मिळवून देण्यासाठी कौशल्य विभाग प्रयत्न करत आहे, अशी माहिती देखील नवाब मलिक यांनी दिली. बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरू केले आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहितींसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करून त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. अशा प्रकारे बेरोजगार आणि उद्योजक यांच्यामध्ये समन्वय घडवून आणण्याचे काम या वेबपोर्टलमार्फत करण्यात येत असमल्याची माहिती नवाब मलिक यांनी दिली.
मागील 3 महिन्यात एप्रिल ते जूनअखेर या वेबपोर्टलवर 1 लाख 72 हजार 165 इतक्या नोकरी इच्छुक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली आहे. यामध्ये मुंबई विभागात 24 हजार 520, नाशिक विभागात 30 हजार 145, पुणे विभागात 37 हजार 562, औरंगाबाद विभागात 35 हजार 243, अमरावती विभागात 14 हजार 260 तर नागपूर विभागात 30 हजार 435 इतक्या नोकरी इच्छुक उमेदवारांनी नोंदणी केली आहे.
यापैकी 17 हजार 133 उमेदवारांना नोकरी मिळवण्यात यश आले असून यात मुंबई विभागातील 3 हजार 720, नाशिक विभागातील 482, पुणे विभागातील 10 हजार 317, औरंगाबाद विभागातील 1 हजार 569, अमरावती विभागातील 1 हजार 22, तर नागपूर विभागातील 23 उमेदवारांचा सहभाग आहे. शिवाय महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीने त्यांच्या उपक्रमातून 582 उमेदवारांना रोजगार मिळवून दिला आहे.
कौशल्य विकास विभागाने मागील 3 महिन्यात राज्यभरात पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्यांची मोठी मोहीम सुरू केली आहे. प्रत्येक जिल्हास्तरावर ऑनलाईन रोजगार मेळावे घेण्यात येत आहेत. मागील 3 महिन्यात 24 ऑनलाईन रोजगार मेळावे संपन्न झाले असून उर्वरित जिल्ह्यांमध्ये लवकरच मेळावे होणार आहेत.
झालेल्या मेळाव्यांमध्ये 167 उद्योजकांनी सहभाग घेतला. त्यांच्याकडील 16 हजार 117 जागांसाठी त्यांनी ऑनलाईन मुलाखती घेतल्या. या मेळाव्यांमध्ये 40 हजार 229 नोकरी इच्छुक तरुणांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी आतापर्यंत 2 हजार 140 तरुणांना रोजगार मिळाला आहे. उर्वरित जागांसाठी उर्वरित तरुणांमधून निवड प्रक्रिया सुरू आहे. सर्व उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यासाठी विभागामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत, असेही मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.
पुढील काळातही रोजगार उपलब्धतेसाठी विभागामार्फत मोहीम पातळीवर काम केले जाईल. नोकरी इच्छुक तरुणांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर नोंदणी करावी. आधी नोंदणी केलेल्या उमेदवारांनी आपली माहिती अद्ययावत करावी, तसेच कुशल उमेदवारांच्या शोधात असलेले उद्योजक, कॉर्पोरेट्स यांनीही या वेबपोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन मंत्री नवाब मलिक यांनी केले आहे.