नाशिक - राज्यातील 52 हजार 431 स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरू असून 1 जुलै ते 15 जुलैपर्यंत राज्यातील 84 लाख 36 हजार 596 शिधापत्रिका धारकांना 16 लाख 32 हजार 420 क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आले, अशी माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे 7 कोटी आहे. या लाभार्थ्यांना 52 हजार 431 स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो. राज्यात या योजनेमधून सुमारे 9 लाख 21 हजार 806 क्विंटल गहू, 7 लाख 8 हजार 528 क्विंटल तांदूळ, तर 9 हजार 485 क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर स्थलांतरित झालेले परंतु लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेल्या सुमारे 1 लाख 87 हजार 202 शिधापत्रिका धारकांनी ते जेथे राहत आहे त्याठिकाणी शासनाच्या पोर्टेबिलिटी यंत्रणे अंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत प्रति लाभार्थी प्रति महिना 5 किलो (गहू, तांदूळ) मोफत देण्याची योजना आहे. 15 जुलैपासून आतापर्यंत जुलै महिन्यासाठी एकूण 9 हजार 656 रेशनकार्डना मोफत (गहू, तांदूळ) वाटप केले आहे. या रेशनकार्डवरील 41 हजार 704 लोकसंख्येला 2 हजार 90 क्विंटल गहू आणि तांदळाचे वाटप झाले आहे.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत प्रति लाभार्थी प्रति महिना 5 किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. 6 जूनपासून आतापर्यंत जून महिन्यासाठी एकूण 1 कोटी 39 लाख 61 हजार 917 रेशनकार्ड धारकांना मोफत तांदूळ वाटप केले आहे. या रेशनकार्डवरील 6 कोटी 31 लाख 47 हजार 73 लोकसंख्येला 31 लाख 57 हजार 350 क्विंटल तांदळाचे वाटप झाले आहे.
राज्य शासनाने कोविड-19 संकटावरील उपाययोजनेसाठी 3 कोटी 8 लाख 44 हजार 76 एपीएल केसरी शिधापत्रिका असलेल्या लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती 5 किलो धान्य सवलतीच्या दराने (गहू 8 रुपये प्रति किलो व तांदूळ 12 रुपये प्रति किलो) देण्याचा निर्णय घेतला आहे. या धान्याचे मे व जून महिन्यासाठी आतापर्यंत 13 लाख 4 हजार 46 क्विंटल वाटप केले आहे.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेत प्रति रेशनकार्ड 1 किलो मोफत डाळ (तूर किंवा हरभरा डाळ) देण्याची तरतूद आहे. आतापर्यंत या योजनेतून सुमारे 3 लाख 71 हजार 159 क्विंटल डाळीचे एप्रिल ते जून महिन्यासाठी वाटप केले आहे. आत्मनिर्भर भारत या योजनेचा अन्नधान्य लाभ मे व जून या 2 महिन्यांसाठी असून त्या अंतर्गत राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट नसलेल्या विनाशिधापत्रिका धारकांना प्रतिव्यक्ती 5 किलो मोफत तांदूळ दिला जात आहे. आतापर्यंत 1 लाख 28 हजार 699 क्विंटल मोफत तांदूळ वितरित केला आहे. राज्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या अन्नधान्याचे वाटप व्यवस्थितरित्या होत असल्याबाबत संनियंत्रण करण्यात येत असून, काळाबाजार करणाऱ्या स्वस्त धान्य दुकानदारांवर कारवाई करण्यात येत असल्याचेही भुजबळ यांनी म्हटले.