कोलकाता - तृणमूल काँग्रेसनं पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत शानदार विजय मिळवत इतिहास कायम केला. राज्यात सलग तिसऱ्यांदा तृणमूल काँग्रेसने सत्ता स्थापन केली. मात्र, नंदीग्राम विधानसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांचा पराभव केला. त्यामुळे गड आला पण सिंह गेला अशी स्थिती तृणमूल काँग्रेसची झाली होती. आता ममता बॅनर्जी भवानीपूर विधानसभा मतदारसंघातून विधानसभेत जाणार असल्याची माहिती आहे.
भवानीपूरचे आमदार आणि कृषीमंत्री शोभनदेव चट्टोपाध्याय यांनी राजीनामा दिला आहे. आमदारकी मिळवण्यासाठी ममता बॅनर्जी या भवानीपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचं माहिती आहे. भवानीपूर हा ममता यांचा पारपांरिक मतदारसंघ आहे. भवानीपूरमधून दीदी गेल्या 11 वर्षांपासून सलग लढत आल्या आहेत. मात्र, यंदा त्यांनी आपला मतदारसंघ बदलला होता. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर येत्या सहा महिन्यांच्या आत ममता बॅनर्जी यांना आमदारकी मिळवणं गरजेचं आहे.
नंदीग्रामच्या पराभवानंतर न्यायालयात जाण्याचा ममतांचा इशारा-
प्रचंड अटीतटीच्या झालेल्या लढतीत नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जींना पराभव पत्करावा लागला. भाजपाचे सुवेंदु अधिकारींनी ममतांचा 1 हजार 736 मतांनी पराभव केला. आधी ममतांनी 1 हजार 200 मतांनी विजयी घोषित करण्यात आले होते. मात्र पुर्नमतमोजणीत ममता बॅनर्जी यांचा 1 हजार 736 मतांनी पराभव झाला. याबाबत बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या की, मी निकाल मान्य करते. पण निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर काहीतरी छेडछाड करण्यात आल्याची माहिती माझ्याकडे असून याविरोधात कोर्टात जाणार आहे. मी सत्य समोर आणणार आहे, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या. निकालानंतर नंदीग्राममधील मतदान आणि निवडणूक प्रक्रियेवर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते.
दीदींचा पराभव करणारे सुवेंदू अधिकारी -
ममता बॅनर्जी यांच्याविरोधात भाजपाने सुवेंदू अधिकारी यांना मैदानात उतरवलं होते. नंदीग्राम हा सुवेंदू यांचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, सुवेंदू यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर हा गडही भाजपाकडे जाणार की काय? असा सवाल केला जात होता. त्यामुळेच ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राममधून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले गेले. बॅनर्जी यांनी जानेवारीत नंदीग्राम सीटवरुन निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. सुवेंदू यांनी ममतांचे आव्हान स्वीकारले होते. 50 हजार मतांनी दीदींचा पराभव करू नाहीतर राजकारण सोडून देऊ, असा दावा सुवेंदू अधिकारी यांनी केला होता.