पाटणा : बिहारच्या बक्सर जिल्ह्यामध्ये काही दिवसांपूर्वी गंगेत वाहून आलेल्या मृतदेहांमुळे खळबळ उडाली होती. यानंतरही हे प्रकार सुरूच असल्याचे दिसून येत आहे. तीन दिवसांपूर्वीच महादेवा घाटावर ७१हून अधिक मृतदेह मिळाले होते, तर आता नाथ बाबा घाटावर आणखी आठ मृतदेह आढळून आले आहेत. दरम्यान, बिहारसोबतच उत्तर प्रदेशच्या गाझीपूरमध्येही असेच मृतदेह आढळून आले होते.
नाथ बाबा घाटावरील मृतदेहांची परिस्थितीही विदारक..
नाथ बाबा घाटावर आढळून आलेल्या मृतदेहांची परिस्थीतीही आधीच्या मृतदेहांप्रमाणे विदारक आहे. परिसरात फिरणारी भटकी कुत्री या मृतदेहांचे लचके तोडताना दिसून येत आहेत. यामुळे गंगेत गेल्या काही दिवसांपासून एवढे मृतदेह कुठून येत आहेत हा प्रश्न पुन्हा वर आला आहे.
यापूर्वी दहा मे रोजी महादेवा घाटावर ७१ मृतदेह आढळून आले होते. कित्येक अधिकाऱ्यांनी हे मृतदेह उत्तर प्रदेशातून वाहत आल्याचा दावा केला आहे. तर, उत्तर प्रदेशमधील अधिकाऱ्यांनी हे दावे फेटाळले आहेत.
सीमेवर लावले जाळे..
राज्य सरकारने यानंतर दिलेल्या निर्देशांनंतर बिहारच्या सीमेवर गंगा नदीमध्ये जाळे लावले आहे. या जाळ्यांमध्ये सहा मृतदेह आढळून आले. यानंतर हे स्पष्ट झाले की हे मृतदेह उत्तर प्रदेशमधून वाहून येत आहेत. यानंतर बिहार प्रशासनाने उत्तर प्रदेश प्रशासनावर टीका केली आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश सरकारने यानंतर असे प्रकार होणार नसल्याचे आश्वासन बिहार सरकारला दिले आहे. यापुढे जी काही कार्यवाही करायची आहे, ती उत्तर प्रदेश सरकार करेल, असे बिहारच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : १८ वर्षांखालील नागरिकांच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी 'कोव्हॅक्सिन'ला परवानगी