भुकेलेल्या अन्न द्या. तहानलेल्या पाणी द्या. वस्त्रहीन व्यक्तींना वस्त्र द्या. गरीब मुलांना शिक्षणात मदत करा. प्रत्येक गरीबाला शिक्षण देण्यात योगदान द्या. बेघर असलेल्यांना आसरा द्या. अंध, विकलांग, आजारी व्यक्तींची मदत करा. बेरोजगारांना रोजगार द्या. पशू-पक्षी, मूक प्राण्यांना अभय द्या. गरीब, कमजोर लोकांच्या मुलांच्या लग्नात मदत करा. दुखी आणि निराश लोकांना हिमंत द्या. हाच खरा धर्म आहे आणि हीच खरी ईश्वरभक्ती आहे. अश्या दशसूत्रीचा संदेश समाजाला देणाऱ्या संत गाडगे महाराज उर्फ डेबूजी झिंगारजी जानोरकर यांची 23 फेब्रुवारी गुरुवार रोजी जयंती आहे. जाणून घेऊया सविस्तरपणे...
प्राथमिक ओळख : ज्या महापुरुषांचा आधुनिक भारताला अभिमान वाटला पाहिजे, त्यामध्ये राष्ट्रसंत गाडगेबाबा यांचे नाव घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही. मानवतेचा खरा परोपकारी, सामाजिक समस्यांची प्रखर जाणीव असलेले मूर्तिमंत प्रतिक असे जर कोणी असेल, तर ते संत गाडगे बाबा होते. 23 फेब्रुवारी रोजी डेबूजी झिंगारजी जानोरकर उर्फ गाडगे बाबा यांची जंयती आहे. गाडगे बाबा यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील शेणगांव गावात एका धोबी कुटुंबात झाला. त्यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगारजी जानोरकर होते. गाडगे बाबांचे बालपण मुर्तिजापूर तालुक्यातील दापुरे या त्यांच्या मामाच्या गावी गेले.
स्वत: पासून केली सुरुवात : गाडगे महाराज चालते फिरते विद्यापीठ होते. आपल्या मुलीच्या जन्मानंतर नातेवाईकांना त्यांनी मांसाहाराचे जेवण न देता गोडाधोडाचे जेवण दिले. हा त्या काळी केलेला फार मोठा बदला होता. पायात तुटकी चप्पल, डोक्यावर फुटके गाडगे, अंगात चिंध्यापासुन तयार केलेला पोषाख असे पायी फिरणारे व्यक्तिमत्व म्हणजे गाडगे बाबा. गागडे महाराज जरी गोपालाचे भजन करीत असले तरी, ते माणसात देव शोधणारे होते. ते नेहमी सांगायचे,अंद्धश्रद्धेला बळी पडू नका, देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराण, मंत्र-तंत्र, चमत्कार सारख्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका, ही त्यांची शिकवण होती. माणसातच दैव आहे असे त्यांचे मत होते. ह्याचाच शोध ते घेत होते.
वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले बाबा : गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले समाजसुधारक होते. दीनदलित आणि पीडितांच्या सेवेसाठी त्यांनी आयुष्यभर परिश्रम घेतले. प्रेबोधनासाठी त्यांनी कीर्तनाचा प्रभावी वापर केला. सामाजिक रूढी आणि परंपरेच्या टीका त्यांच्या कीर्तनात असायच्या. त्यांनी समाजाला शिक्षणाचे महत्व पटवून दिले. स्वच्छता आणि चारित्र्याची शिकवण दिली. गाडगे महाराजांमध्ये गोरगरीब, दीनदलित ह्यांच्यामधील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळ होती. लोकांमधील अंधश्रद्धा आणि गरीबी दूर करण्यासाठी शिक्षणाचे महत्व त्यांना माहित होते. त्यामुळेच प्रसंगी घरातील वस्तू विका पण आपल्या मुलांना शिकवा असे ते लोकांना सांगायचे.
गावा गावात साफसफाई : गाडगेबाबा कोणत्याही गावात गेल्यावर लगेचच गटारी आणि रस्ते साफ करायला सुरुवात करायचे. त्यांचे काम संपले की, ते स्वतः गावातील स्वच्छतेबद्दल लोकांना मार्गदर्शन करीत अभिनंदन करायचे. गावातील लोकं गाडगे बाबांना जे पैसे द्यायचे, त्या पैशांचा ते नि:स्वार्थपणे सामाजिक विकास आणि समाजाच्या भौतिक विकासासाठी वापर करत असत. त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अनेक धर्मशाळा, गोशाळा, शाळा, रुग्णालये आणि वसतिगृहे बांधली. भिक मागून त्यांनी हे सर्व उभारले. मात्र, ते स्वत: आयुष्यभर धर्मशाळांच्या व्हरांड्यावर किंवा जवळपासच्या झाडांखाली राहीले. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी संत गाडगे बाबांनी आपले आयुष्य वेचले आहे. संत तुकाराम महाराजांना ते आपले गुरु मानत असत. आपल्या कीर्तनात ते वऱ्हाडी भाषेचा प्रयोग करायचे. ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’असे ते म्हणायचे. गाडगे महाराजांचे 20 डिसेंबर 1956 रोजी निधन झाले. पण आजही त्यांचे आदर्श विचार आणि आदर अनेकांच्या ह्दयात जिवंत आहे.