नवी दिल्ली - भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या परिस्थितीवर पंतप्रधान मोदी लक्ष ठेवून आहेत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी राज्य सरकारांनी लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय ठेवावा. तसेच लॉकडाउन टाळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे, असे आवाहन केले.
दुसऱ्या लाटेमुळे कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ -
देशातील नागरिकांना जो त्रास होत आहे. त्याची मला पूर्ण कल्पना आहे. अनेकांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. तुमच्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून मी तुमच्या दुखा:त सहभागी असल्याचे प्रधानमंत्री मोदी यांनी म्हटले. आज देश पुन्हा कोरोनाविरूद्ध एक मोठी लढाई लढत आहे. काही दिवसांपूर्वी परिस्थिती स्थिर होती. परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली. कोरोनाचे हे आव्हानाला आपल्याला धैर्याने सामोरे जावे लागेल, असेही त्यांनी म्हटले.
ऑक्सिजनसाठी सरकारतर्फे उपाययोजना -
देशात ऑक्सिजनचे उत्पादन आणि पुरवठा वाढविण्यासाठी अनेक स्तरांवर उपाययोजना केल्या जात आहेत. यामध्ये नविन ऑक्सिजन प्लांट्स तयार करणे, उद्योगांमध्ये वापरले जाणारे ऑक्सिजन रुग्णांसाठी वापरणे, ऑक्सिजन रेल, अशा विविध उपाययोजना केल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच काल वैद्यकीय तज्ज्ञांसोबत झालेल्या बैठकीत 1 मे पासून 18 वर्षावरील सर्वांना लस देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले. या निर्णयामुळे शहरांमधील कर्मचार्यांना ही लस जलद गतीने उपलब्ध होईल आणि त्यांच्या कामावर कोणाताही परिणाम होणार नाही, असेही ते म्हणाले.
हेही वाचा - महाराष्ट्राच्या लेकीने ८०९१ मीटर उंच अन्नपूर्णा शिखर केले सर, ठरली पहिली भारतीय महिला