नवी दिल्ली : केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर शेतकरी आंदोलनाला सुरुच आहे. २६ मे रोजी या आंदोलनाला सहा महिने पूर्ण होतील. यानिमित्ताने संयुक्त किसान मोर्चाने हा दिवस 'ब्लॅक डे' म्हणून पाळण्याचे ठरवले आहे. विशेष म्हणजे, याच दिवशी पंतप्रधान मोदी आपल्या कार्यालयात सात वर्षांचा कालावधी पूर्ण करतील.
ब्लॅक डे आंदोलनासाठी आवाहन..
संयुक्त किसान मोर्चाने या दिवशी देशभरातील शेतकऱ्यांना दिल्लीच्या सीमेवर येण्याचे आवाहन केले आहे. "जिंदा है, तो दिल्ली आजा" असे घोषवाक्य या आंदोलनासाठी तयार करण्यात आले आहे. या घोषवाक्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आंदोलनास येण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
ज्यांना शक्य आहे त्यांनी सीमेवर यावे, अथवा आपल्या घरुनच या आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असेही ऑल इंडिया किसान संघर्ष समन्वय समितीचे सह-संयोजक अविक शाह यांनी स्पष्ट केले आहे. आपल्या घरांवर, दुकानांवर किंवा कार्यालयांवर काळे झेंडे लाऊन या आंदोलनाला पाठिंबा दाखवावा, असे ते म्हणाले.
चर्चा करण्याचे मोदींना आवाहन..
संयुक्त किसान मोर्चाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून हा वाद लवकरात लवकर सोडवण्याचे आवाहन केले आहे. तसेच, युनायटेड किसान मोर्चानेही सरकारने शेतकऱ्यांशी पुन्हा चर्चा सुरू करावी अशी पंतप्रधानांना मागणी केली आहे.
दरम्यान, ऑल इंडिया फार्मर्स सोसायटीचे अध्यक्ष कृष्णबीर चौधरी यांनी किसान मोर्चालाच लक्ष्य केले आहे. किसान मोर्चा एमएसपीच्या आपल्या जुन्या मागण्यांवर अडून राहिल्यामुळेच चर्चा पुढे सरकत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा : बंगालला धडकणार 'यश' चक्रीवादळ; पंतप्रधान मोदी आज घेणार आढावा बैठक