जोशीमठ/ डेहराडून - उत्तराखंड राज्यातील चमोली जिल्ह्यात हिमस्खलन झाल्याने मोठी दुर्घटना घडली. आत्तापर्यंत २६ जणांचा मृत्यू झाला असून १७१ जण बेपत्ता झाले आहेत. बचावकार्य सुरू असून मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी ठाण मांडून आहेत. ईटीव्ही भारत या घटनेबाबत क्षणाक्षणाचा अपडेट आपल्याला देत असून उत्तराखंड राज्याचे ब्युरो चिफ किरनकांत शर्मा यांनी मुख्यमंत्र्यांकडून माहिती घेतली.
अनेक गावांचा संपर्क तुटला -
'हिमकडा कोसळून नव्हे तर ताजा बर्फ वेगाने कोसळल्यानं दुर्घटना घडल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. नदीला पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री गेले होते. तपोवन उर्जा प्रकल्पाचे मोठे नुकसान झाले असून ऋषीगंगा प्रकल्प पूर्णपणे वाहून गेल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तज्ज्ञ पथकाचा अहवाल येणे बाकी असल्याचे ते म्हणाले. बर्फ डोंगरावरुन कोसळण्याचा वेग काय होता, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
घटनास्थळी वैज्ञानिकांचे पथके दाखल -
सध्या आपत्तीत अडकलेल्या नागरिकांचे जीव वाचवण्यास आम्ही प्राधान्य देत असल्याचे त्रिवेंद्र सिंह म्हणाले. त्यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची चौकशी केली. दरम्यान, या नसर्गिक आपत्तीचा अभ्यास करण्यासाठी वैज्ञानिकांचे पथकही घटनास्थळी दाखल झाले आहे. डीआरडीओ आणि भारत सरकारचे इतर वैज्ञानिक विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. इस्रोकडून डोंगरभागाचे छायाचित्रे मागवण्यात आली असून त्यांचा अभ्यास सुरू आहे.