उन्नाव - आज उत्तर प्रदेशातील उन्नावमधील बिहार पोलीस ठाणे क्षेत्रात मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली. उन्नावमध्ये आणखी एका बलात्कार पीडितेला जिवंत जाळण्याची घटना घडली आहे. हैदराबादमध्ये पशुवैद्यक तरुणीला बलात्कार करून तिची हत्या करून जाळण्यात आले होते. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. मात्र, या घटनेनंतर केवळ आठवड्याभरातच देशभरात अशा प्रकारच्या पाच ते सहा घटना घडल्या आहेत. ही बाब धक्कादायक आहे.
उन्नावमध्ये गावाबाहेर शेतात गेलेल्या तरुणीवर ५ जणांनी मिळून रॉकेल ओतून जिवंतपणी पेटवून दिल्याची भयंकर घटना घडली आहे. या तरुणीने काही महिने आधी २ जणांवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. यापैकी एकाला पोलिसांनी अटकही केली होती. या रागातून हे या ५ जणांनी हे कृत्य केल्याचे चित्र आहे. दरम्यान, संबंधित तरुणी आगीत गंभीररीत्या भाजली असून रुग्णालयात जीवन-मृत्यूशी झुंज देत आहे. ही घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली असून या संपूर्ण भागात भीतीचे वातावरण आहे. या तरुणीच्या नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या तरुणीला सुरुवातीला गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. नंतर तिची गंभीर स्थिती पाहता तिला तेथून जिल्हा रुग्णालयात पाठवले. त्यानंतर तिला लखनौला हलवण्यास सांगण्यात आले आहे. या पाचही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
उन्नावचे पोलीस अधीक्षक विक्रांत वीर यांनी या घटनेची माहिती दिली.
तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, तिला ५ जणांनी रॉकेल ओतून पेटवून दिले. यापैकी शुभम त्रिवेदी, हरिशंकर त्रिवेदी आणि उमेश वाजपेयी या पाचही जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तर, इतर दोघांना पकडण्यासाठी पोलिसांची चार पथके तयार केली आहेत. त्यांना लवकरच अटक होईल.
पीडित तरुणीने मार्च महिन्यात २ जणांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. यामध्ये पोलिसांनी दोघांविरोधात कायदेशीर कारवाई करून एकाला अटक केली होती. याचा राग मनात धरून हे कृत्य केल्याचे चित्र आहे.
-विक्रांत वीर सिंह, पोलीस अधीक्षक