नवी दिल्ली - भारतातील कोरोना संसर्गाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या 24 तासात देशात एकूण 1 हजार 897 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 73 जण दगावले आहेत. महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात आणि दिल्लीमध्ये कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण आढळून आले आहेत.
देशातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 31 हजार 332 झाला आहे, यात 22 हजार 629 अॅक्टिव्ह केस आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तर 7 हजार 695 जण पूर्णत: बरे झाले आहेत. तसेच 1 हजार 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहितीही आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
महाराष्ट्रामध्ये 9 हजार 318 कोरोनाबाधित असून 400 जणांचा मृत्यू झाला आहे. गुजरातमध्ये 3 हजार 744 कोरोनाबाधित असून 181 जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीमध्ये 3 हजार 314 कोरोनाबाधित तर 54 जणांचा मृत्यू झाला आहे. राजस्थानमध्येही 2 हजार 364 कोरोनाबाधित आढळले असून 51 जणांचा मृत्यू झाला आहे. यापाठोपाठ तामिळनाडूमध्ये 2 हजार 58 कोरोनाबाधित असून 25 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
सध्या कोरोनाशी लढण्यासाठी जगातील सर्वच देश युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोरोनाग्रस्तांची चाचणी लवकर होणे आणि त्यांचे निदान कमीत-कमी वेळेत होणे. देशभरातील लॉकडाऊन दुसऱ्यांदा वाढविण्यात आला आहे. अनेक राज्यांमधील परिस्थिती सुधारत असताना काही राज्यांमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे. एक महिन्यापासून देशामध्ये संचारबंदी लागू आहे. त्यामुळे सर्व उद्योगधंदे बंद आहेत.
सध्या सोशल डिस्टन्सिंग हाच कोरोनासाठी रामबाण उपाय आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे वारंवार आवाहन केले जात आहे. मात्र, अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडताना पाहायला मिळत आहे. लॉकडाऊनचे दिवस जसजसे वाढत चालले आहेत, तसे लोकांचा धीर सुटत चालला आहे. अनेक ठिकाणी सोशल डिस्टनसिंगचे नियम डावलून लोकं रस्त्यावर विनाकारण फिरताना दिसतात.