नवी दिल्ली - बालाकोटमध्ये दहशतवादी तळ पुन्हा सुरू झाल्याचे गृहमंत्रालयाने राज्यसभेत सांगितले. पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांनी येथे भारताविरोधात धार्मिक कट्टरतावादाचे आणि जिहादचे प्रशिक्षण देण्यास पुन्हा सुरुवात केल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
काँग्रेस खासदार अहमद पटेल यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गृहमंत्रालयाचे जी. के. रेड्डी यांनी ही माहिती दिली. पटेल यांनी 'सरकारला बालाकोटमध्ये दहशतवादी तळ पुन्हा सुरू झाल्याबद्दल काही माहिती आहे का? तसेच, यावर सरकार काही उपाययोजना करत आहे का,' असा प्रश्न विचारला होता.
'देशाच्या अखंडतेसाठी आणि सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलण्यास आम्ही कटिबद्ध आहोत,' असे सरकारकडून सांगण्यात आले. या वर्षाच्या सुरुवातीला भारतीय हवाई दलाने बालाकोटमधील जैश-ए-मोहम्मदच्या तळावर एअर स्ट्राइक केला होता.