नवी दिल्ली - भारतामध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत देशात तब्बल 54 लाख 16 हजार 849 जणांना कोरोना लस देण्यात आली आहे. तर सर्वांत जास्त लसीकरण उत्तर प्रदेश राज्यात झालं असून 6 लाख 73 हजार 542 जणांना लस देण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्रात 4 लाख 34 हजार 943, राजस्थानमध्ये 4 लाख 14 हजार 422, कर्नाटकात 3 लाख 60 हजार 592 लोकांना लस देण्यात आली आहे.
भारतात 16 जानेवारीपासून लसीकरण सुरू झाले आहे. जगात लसीकरणाची मोहिम भारतामध्ये सर्वांत वेगाने सुरू आहे. गेल्या 21 दिवसात तब्बल 50 लाख लोकांना लस देण्यात आली आहे. आतापर्यंत 20 कोटी कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. कोरोनाचा प्रसार झाल्यापासून 1 कोटी 8 लाख 14 हजार 304 कोरोना रुग्णांची आतापर्यंत नोंद झाली आहे. तर 1 लाख 54 हजार 918 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तर गेल्या 24 तासात 95 जणांचा मृत्यू झाला आहे.
भारताने कोव्हिशील्ड लस आतापर्यंत भूतान, मालदीव, नेपाळ, बांगलादेश, म्यानमार देशांना पाठवली आहे. सर्वच देशांनी आपापल्या पद्धतीने कोरोनाशी लढा देत त्यावर मात करण्याचे प्रयत्न केले. भारतानेही कोरोनाचा प्रभावीपणे सामना केला. भारताच्या या प्रभावी लढ्याचे जगभरातूनही मोठे कौतुक करण्यात आले.
राज्यांना फटका -
कोरोना संकटाचा देशातील सर्वच राज्यांना मोठा फटका बसला. वेगवेगळ्या राज्याच्या अर्थव्यवस्थेतील वैविध्यानुसार बदलही यात बघायला मिळाले. जसे की, महाराष्ट्रातील सेवा क्षेत्राला कोरोनाचा मोठा फटका बसला. तामिळनाडू आणि केरळातील बांधकाम क्षेत्र, गुजरातमधील उत्पादन क्षेत्र, पंजाबचे कृषी क्षेत्र, तसेच दिल्ली आणि तेलंगणातील असंघटीत क्षेत्राची कोरोनामुळे मोठी हानी झाली.