पिथौरागड (उत्तराखंड) : पुराणकाळातील गुहांची नावं समोर येताच त्यांच्या रहस्यांबद्दल जाणून घेण्याची इच्छा होते. कित्येक गुहा स्वत:च्या पोटात विविध रहस्य दडवून आहेत. अशाच प्रकारची एक गुहा पिथौरागडच्या गंगोलीहाट तालुक्यात आहे. भगवान शंकराने धडापासून वेगळे केलेले गणेशाचे मस्तक याच ठिकाणी येऊन पडल्याची आख्यायिका आहे. याचा उल्लेख पुराणांमध्ये मिळतो.
पाताळ भुवनेश्वराच्या गुहेत भगवान गणेशाचे खरे मस्तक ठेवण्यात आल्याचे म्हटले जाते. गणपतीच्या जन्माविषयी अनेक कहाण्या प्रचलित आहेत. भगवान शंकराने क्रोधित होऊन गणेशाचं मुंडकं उडवलं होतं. यानंतर पार्वतीच्या सांगण्यानुसार भगवान शंकराने गणपतीला हत्तीचे मस्तक लावले. या कथेदरम्यान उडवलेले मस्तक भगवान शंकराने पाताल भुवनेश्वराच्या गुहेत ठेवल्याचे म्हटले जाते. या लिंगरुपी गणेशाच्या वरती 108 पाकळ्यांचे दगडी ब्रह्मकमळ आहे. त्यामधून पींडीवर सतत पाण्याचे थेंब पडत असतात. या थेंबांची दिशा आदिगणेशाच्या तोंडावर पडताना दिसते. हे ब्रह्मकमळ भगवान शंकराने या ठिकाणी प्रस्थापित केल्याचे मानले जाते. समुद्रसपाटीपासून 1350 मीटर उंच असलेल्या पाताल भुवनेश्वराची गुहा प्रवेशद्वारापासून 160 मीटर लांब असून 90 फूट खोल आहे. या गुहेत केदारनाथ, बद्रीनाथ आणि अमरनाथाचे दर्शन होते. स्कंदपुराणात पाताल भुवनेश्वराच्या गुहेचा उल्लेख आला आहे.
पुराणातील वर्णन
पुराणांमधील कथांनुसार या गुहेत भगवान शंकर स्वत: विराजमान होते. त्यांची उपासना करण्यासाठी अन्य देव या ठिकाणी पोहोचले होते. द्वापार युगात पांडवांनी या ठिकाणी जुगार खेळला होता. तर त्रेता युगातील राजा ऋतुपर्ण हरणाचा पाठलाग करताना या ठिकाणी पोहोचले होते. यावेळी राजाने भोलेनाथासह अन्य देवतांचेही दर्शन केले होते. कलियुगात जगद्गुरु शंकराचार्यांना इसवी सन 722 च्या सुमारास या गुहेत साक्षात्कार झाला. यावेळी त्यांनी मंदिरातील शिवलिंगाला तांब्याच्या आवरणाने बंद करुन टाकले. कारण या शिवलिंगात एवढे तेज होते, की कोणत्याही व्यक्तीने त्याला उघड्या डोळ्यांनी पाहिल्यास त्याला अंधत्व येण्याची शक्यता होती. यानंतर अनेक राजांनी काही काळानंतर या गुहेचा शोध लावला.
कलियुगाचा अंत
या गुहेत चारही युगांच्या प्रतिकात्मक चार दगडांची स्थापना केली आहे. यातील कलियुगाचा प्रतिक असलेला दगड हळूहळू वरती येत आहे. हा दगड ज्या दिवशी भिंतीला टेकेल, त्या दिवशी कलियुगाचा अंत होईल, अशी समजूत आहे.
पौराणिक इतिहास
पुराणांच्या अनुसार पाताल भुवनेश्वर असे एकमेव ठिकाण आहे जेथे चारही धामांचे एकाचवेळी दर्शन होते. पाताल भुवनेश्वर गुहेतील लिगांचे दर्शन घेतल्यानंतर चारधाम यात्रेचे दर्शन पूर्ण होते, अशी मान्यता आहे. गुहेत चारही युगांचे साक्षीदार असे द्वार आहे. याच गुहेत कालभैरवाच्या जीभेचेही दर्शन होते. कालभैरवाच्या तोंडात प्रवेश करून गर्भातून शेपटीपर्यंत गेल्यास मोक्ष मिळत असल्याची अख्यायिका आहे.या गुहेत केदारनाथ, अमरनाथ आणि बद्रीनाथाचे एकाच वेळी दर्शन होते. तक्षक नागाच्या आकृतीच्या पाषाणात ही गुहा समोर येते.
गुहेतील आकृत्या
गुहेत प्रवेश करताच नरसिंहाचे दर्शन होते. थोडं खाली जाताच शेषनागाच्या फण्यासारखी संरचना आहे. पृथ्वी शेषनागाच्या फण्यावर टिकून असल्याची समज आहे. गुहेत आणखी पुढे गेल्यास गायीची प्रतिकृती आढळते. तिला कामधेनु गाय असे म्हटले जाते. देवतांच्या वेळी या गायीच्या स्तनांतून दुधाची धार वाहत होती. मात्र आता कलियुगात यामधून पाण्याचे थेंब बाहेर येत आहेत.या गुहेच्या आतमध्ये मान वळवून एक हंस बसला आहे. तो कुंडाच्या वरती विराजमान आहे. भगनाव शंकराने त्यांच्या नागांना पाणी पिण्यासाठी हा कुंड बनवला होता. हंसावर त्याची जबाबदारी दिली होती. मात्र ज्या वेळी हंसाने त्या तळ्यातून पाणी पिण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी क्रोधित होऊन शंकराने त्याची मान मोडली. या तळ्यातील पाणी उष्ट केल्याने ब्रह्माच्या या हंसाला शंकराने घायाळ केले होते, अशी दंतकथा प्रचलित आहे.