जयपूर(भरतपूर) - कोरोना लॉकडाऊनमुळे मजूरांचे आणि कामगारांचे प्रचंड हाल सुरू आहेत. काहींनी मिळेल त्या साधनाने तर काहींनी पायीच घरचा रस्ता धरला आहे. भरतपूरमध्ये एका स्थलांतरित मजूराने आपल्या पत्नीची अंगठी विकून घरी जाण्यासाठी बैलगाडी विकत घेतली आहे. बैल खरेदी करण्यासाठी पैसे नसल्याने एका भटक्या बैलाला पकडून बैलगाडीला जोडून या मजूराने घरचा रस्ता धरला आहे. संजय नट असे या मजूराचे नाव आहे.
संजय मूळचा उत्तर प्रदेशातील नगला तांगड येथील रहिवासी आहे. मागील अनेक वर्षांपासून शिलाई मशीन दुरुस्ती आणि खेळ दाखवून त्यांचे कुटुंब गुजराण करत होते. मात्र, कोरोना लॉकडाऊनमुळे परिस्थिती फारच बिघडली. घरात खाण्यासाठी काहीच शिल्लक राहिले नाही. एक महिना शेजाऱयांच्या मदतीने संजयच्या कुटुंबाची भूक भागत राहिली. मात्र, कालांतरांने शेजाऱयांचीही मदत मिळेनाशी झाली. त्यामुळे संजयने गावी जाण्याचा निर्णय घेतला.
मात्र, घरी जाण्यासाठी साधन नव्हते म्हणून त्यांनी पत्नीची अंगठी विकून मिळालेल्या सहा हजार रुपयांमध्ये एक बैलगाडी विकत घेतली. शेजारच्या काही लोकांच्या मदतीने एका भटक्या बैलाला पकडून गाडीला जोडले. त्यानंतर त्यांनी कुटुंबाला बैलगाडीत बसवून घरचा रस्ता धरला आहे.