नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आषाढी पौर्णिमेच्या आज सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. याप्रसंगी ज्या गुरुंनी आपल्याला ज्ञान दिले, त्यांचे स्मरण करण्याचा आजचा दिवस असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.ते आषाढी पौर्णिमेनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, की आज आषाढी पौर्णिमेनिमित्त सर्वांना माझ्या शुभेच्छा आहेत. हा दिवस गुरू पौर्णिमा म्हणूनही ओळखला जातो. गुरुंचे स्मरण करण्याचा आजचा दिवस. या प्रेरणेतून आपण भगवान बुद्धांना अभिवादन करतो. भगवान बुद्धांनी अष्टांगिक मार्गातून अनेक समाज आणि देशांना चांगल्या जीवनाचा मार्ग दाखविला आहे. आज, जग असामान्य आव्हानांशी लढत आहे. या आव्हानांवरील अंतिम उपाय हा भगवान बुद्धांच्या शिकवणीत आहे. ते भूतकाळाशी निगडित होते. ते वर्तमानकाळाशी निगडित आहेत आणि ते भविष्याशी निगडित राहणार असल्याचे मोदी यांनी यावेळी सांगितले.
यावेळी मोदी यांनी करुणा आणि दयेचे महत्त्व अधोरेखित केले. भगवान बुद्धांची शिकवण ही कृती आणि विचारातून साधेपणा दाखवित असल्याचे मत पंतप्रधानांनी व्यक्त केले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी इंटरनॅशनल बुद्धिस्ट कॉन्फेडरेशनकडून (आयबीसी) आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी लेहमध्ये अचानक दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांनी चीनचे थेट नाव न घेता विस्तारवादाचे नाही तर विकासवादाचे युग आल्याचे मत व्यक्त केले होते.