नवी दिल्ली - विशाखापट्टनम येथील हिंदुस्तान शिपयार्डमध्ये शनिवारी अवाढव्य क्रेन अचानक कोसळल्याने 11 लोकांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी विभागीय चौकशी समिती स्थापन केल्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले. विशाखापट्टनम अत्यंत दु:खद घटना घडली असून जीवितहानी झाली आहे, असे राजनाथ सिंह म्हणाले. तसेच त्यांनी मृताच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या, तर जखमींच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली.
विशाखापट्टनम येथील हिंदुस्तान शिपयार्डमध्ये आज सकाळी अपघात झाला. या अपघातात ११ कामगारांचा मृत्यू झाला असून काही जण जखमी आहेत. शिपयार्डमधील अवाढव्य क्रेन अचानक कोसळल्याने हा अपघात झाला. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगन मोहन रेड्डी यांनी या अपघाताची माहिती घेतली. त्यानंतर जिल्हा प्रशासन आणि विशाखापट्टनम पोलिसांना या प्रकरणी तत्काळ योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले.
अपघात झालेल्या क्रेनचे वजन ७० टन होते. दोन वर्षांपासून या क्रेनची निर्मीती सुरू होती. आज सकाळी त्याची चाचणी घेण्यात येत होती. क्रेनच्या वजन उचलण्याची क्षमता तपासली जात असताना वरील भागात असलेल्या केबिनचा काही भाग क्रेनपासून अलग झाला आणि त्यानंतर काही वेळेतच संपूर्ण क्रेन खाली आले, अशी माहिती जिल्हाधिकारी व्ही. विनय चंद यांनी दिली.