हैदराबाद - मागील अनेक वर्षांचा रेकार्ड मोडत मागील चार दिवसांपासून हैदराबादसह तेलंगाणा राज्याला पावसाने झोडपले आहे. तेलंगाणामध्ये पावसाने केलेल्या हाहाकारात गेल्या काही दिवसात ५० जणांचा मृत्यू झाला आहे. यात अनेक कोटींचे नुकसान झाल्याचे तेलंगाणा सरकारचा अंदाज आहे. पावसाने विस्कळीत झालेले जनजीवन सध्या पूर्वपदावर येत आहे. हैदराबादमधील रचकोंडा भागातही पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. तेलंगाणाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक व रचकोंडाचे पोलीस आयुक्त महेश भागवत व त्यांच्या टीमने पुराच्या पाण्यात उतरून अनेकांना 'सहारा' दिला आहे.
![Rachakonda Police Commissioner](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/121079520_1553337374860313_7876671118755768507_o_1910newsroom_1603108176_938.jpg)
हैदराबादमध्ये १९१६ नंतर प्रथमच एवढ्या प्रमाणात पाऊस झाला आहे, असे तेलंगाणाच्या सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले. ग्रेटर हैदराबाद महापालिकेला त्वरित मदतकार्य करण्यासाठी तेलंगाणा सरकारने ५ कोटी रुपयांची मदत दिली आहे. तर पावसाच्या संकटात मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदतही तेलंगाणा सरकारने जाहीर केली आहे. ज्या व्यक्तींचे घर पावसाने पूर्ण उद्धवस्त झाले असल्यास त्यांना सरकारकडून नवीन घर बांधून देण्यात येणार आहे. तर घराचे नुकसान झाले असल्यास सरकारकडून अंशत: आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. हैदराबादमधील ३५ हजार कुटुंबांना फटका बसल्याचे तेलंगणा सरकारने सांगितले. नागरिकांनी तात्पुरती राहण्यासाठी सोय व्हावी, यासाठी सरकारने ७२ निवारागृहे सुरू केली आहेत.
![Rachakonda Police Commissioner](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/14362596_10209628093033420_8578303532357504229_o_1910newsroom_1603108176_328.jpg)
या पावसाचा फटका हैदराबादमधील रचकोंडा विभागालादेखील बसला आहे. या विभागाचे मराठमोळे पोलीस आयुक्त महेश भागवत यांनी या आपत्तीकाळात चोख बंदोबस्त ठेवत अनेकांचे जीव वाचवले. रचकोंडा भागात मागील 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. सखल भागात पूरस्थिती निर्माण झाली असल्यामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. अशा परिस्थिीत महेश भागवत हे स्वत: पाण्यात उतरून परिस्थितीचा आढावा घेत आहेत. महेश भागवत यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पोलीस विभागाकडून या काळात लाखो नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. त्यांच्या खाण्यापिण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे.
![Rachakonda Police Commissioner](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/ekscs-cu0aioh8d_1910newsroom_1603108176_408.jpg)
अफवांवर विश्वास ठेऊ नका -
सध्या रचकोंडा भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. पुढील 4 दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे अत्यावश्यक आणि गरजेचे काम असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असे आवाहन रचकोंडाचे पोलीस आयुक्त महेश भागवत यांनी नागरिकांना केले आहे. तसेच याकाळात अफवांवर विश्वास ठेऊ नका असे आवाहनदेखील भागवत यांनी केले आहे.